बंडखोरांची उलटी गिनती सुरू, महायुतीमध्ये नक्की काय घडणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेसकडे…

विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी अपक्षांशी सकारात्मक चर्चा केली असून सर्व अपक्ष अर्ज मागे घेतील, असा विश्वास भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

बंडखोरांची उलटी गिनती सुरू, महायुतीमध्ये नक्की काय घडणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेसकडे...
Chandrashekhar Bawankule
| Updated on: Jun 04, 2026 | 10:49 AM

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता विधानपरिषदेतील बंडखोरी टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महायुतीमधील सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व अपक्ष उमेदवारांशी सकारात्मक चर्चा केली आहे, असे म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकांबद्दल सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ नाही, त्या ठिकाणी त्यांनी आपले अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला केली आहे.

महायुतीकडे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत

ही निवडणूक जनतेमधून होणारी नाही, तर संख्याबळावर आधारित आहे. ज्या पक्षाकडे जेवढे सदस्य, त्या पक्षाचा विजय हे चित्र अगदी स्पष्ट आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्यात आणि पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या काळात निवडणुकांचा खर्च आणि त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यावहारिक विचार करून संख्याबळानुसार पावले उचलल्यास महाराष्ट्रात ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. महायुतीकडे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे नागपूर, भंडारा, अमरावतीसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही

आमच्या पक्षाचे आणि मित्रपक्षांचे अध्यक्ष अपक्षांविषयी योग्य तो निर्णय घेत आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. कोणतीही मोठी बंडखोरी उरणार नाही. सर्व बंडखोर उमेदवार पक्षाचा शब्द मानून अर्ज मागे घेतील. माझी कालच सत्तार यांच्याशी भेट झाली. ते पूर्णपणे आनंदी आहेत. आमच्यात काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, पण मनभेद अजिबात नाहीत, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

यावेळी यवतमाळमधील काँग्रेसच्या उमेदवारीवर बोलताना त्यांनी टोला लगावला. केवळ हरण्यासाठी निवडणूक लढण्यात काय अर्थ आहे, याचा विचार काँग्रेसचे उमेदवारही करत असतील. जिथे मतांमध्ये ७०० विरुद्ध २०० असा मोठा फरक आहे, तिथे विनाकारण निवडणूक लढवू नये. विदर्भातील पाचही जागा महायुती जिंकेल. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीची जबाबदारी बंटी भांगडिया तर भंडाऱ्याची निवडणूक परिणय फुके पाहत आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले.

Follow Us