मोठी बातमी! भाजपकडून कुणाला संधी? थेट दिल्लीत खलबतं, 48 नावांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण नितीन नबीन यांच्या भेटीला
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता उमेदवारीचा फैसला दिल्लीतून होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता उमेदवारीचा फैसला दिल्लीतून होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे. यावेळी चव्हाण यांनी भाजपकडून इच्छुक असलेल्या एकूण 48 नावांची यादी पक्ष नेतृत्वाकडे दिली आहे. आता आगामी काळात यातील काही नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
48 नावांची यादी दिल्ली दरबारी
गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजप 11 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागांसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. अशातच आता एकूण 48 जणांच्या नावाची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्लीला गेले आहेत. ही यादी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली आहे. आता केंद्रीय नेतृत्व यावर चर्चा करून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.
अद्याप जागावाटप ठरलेले नाही
अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या फॉर्म्युलात भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गटाला 2 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र आता हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने किमान 6 ते 7 जागांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप अंतिम होऊ शकलेले नाही.
जागावाटपाबाबत एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाह यांच्या मध्यस्थीची मागणी केली आहे. विशेषतः ठाणे आणि नाशिक या जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असून, तिथून कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची रणनीती एकनाथ शिंदेंनी आखली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील या हाय-प्रोफाइल भेटीनंतर अमित शाह कोणता तोडगा काढतात आणि महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.