मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की… राज ठाकरेंचा संताप, म्हणाले मी पत्रकार परिषद घेऊन…
राज ठाकरे यांनी इगतपुरी शिबिरातील पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संवादानंतर माध्यमांनी केलेल्या उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबतच्या अंदाजांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्वतःच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप केला आहे आणि भविष्यात कोणतेही राजकीय विधान अधिकृत पत्रकार परिषदेतूनच करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.

सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजयी मेळाव्यानंतर सातत्याने युतीबद्दल बोललं जात आहे. याबद्दल सातत्याने बातम्या येत आहेत. ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता या बातम्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करणारी एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सुरु असलेल्या चर्चांवरुन माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या १४ आणि १५ जुलै रोजी इगतपुरीत मनसेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मनसेच्या शिबिरादरम्यान पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संवादानंतर काही माध्यमांनी युतीबाबत अनेक बातम्या समोर आल्या. मात्र यावर आता राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या तोंडी चुकीची विधाने टाकली गेली, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरेंची संपूर्ण पोस्ट
“सस्नेह जय महाराष्ट्र, १४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.
त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!
नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन”, असे राज ठाकरे म्हणाले.
पोस्टमुळे चर्चांना उधाण
दरम्यान राज ठाकरे यांनी काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना असे प्रकार न करण्याची विनंती केली आहे. कोणतंही राजकीय विधान करायचं असल्यास आपण अधिकृत पत्रकार परिषद घेऊ, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
