मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार..

मोदी सरकार आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. तसा निर्णय देखील झाला. फक्त आता घोषणा बाकी आहे. दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील दोन खासदारांचे नाव चर्चेत आहे.

मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार..
Modi government Cabinet
| Updated on: Jun 26, 2026 | 11:39 AM

मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सरकारने काही निर्णय घेतले. एलपीजी गॅससह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली. आता केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला. मोठे फेरबदल केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होऊ शकतात. फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी असून सर्वकाही ठरल्याचीही माहिती मिळतंय. यादरम्यान नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशीही एक चर्चा आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाची घोषणा होऊ शकते. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नाही, अशांना बाहेरचा रस्ता दाखवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. दोन केंद्रिय मंत्र्यांना डिच्चू देऊन दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

विशेष बाब म्हणजे राज्यातील दोन खासदारांना मोदी सरकार त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान देऊ शकते, अशी चर्चा आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार संजय जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यामुळे कोणत्याही क्षणी या फेरबदलाची घोषणा होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढली. आता श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तसा निर्णयही झाल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत चक्क 6 खासदार शिवसेना शिंदे गटात गेले. मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेशही झाला. याबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठे काम केले. खासदारांच्या संपर्कात तेच होते. लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे राज्यात दाखल झाले होते. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन टायगर यशस्वी झाले.

Follow Us