पंतप्रधान मोदींच्या सभेला अजित पवार का गेले नाहीत ? फडणवीस स्पष्टच बोलले..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवारांच्या अनुपस्थितीचे कारण आणि महायुतीतील आंतरिक मतभेद यावर चर्चा सुरू आहे. TV9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

पंतप्रधान मोदींच्या सभेला अजित पवार का गेले नाहीत ? फडणवीस स्पष्टच बोलले..
पंतप्रधानांच्या सभेला अजित पवार का गेले नाहीत ?
| Updated on: Nov 18, 2024 | 10:00 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडण्यास आता अवघे 2 दिवस उरले आहेत. 20 तारखेला राज्यभरात मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागेल. महायुती असो किंवा महाआघाडी निवडणुकीत सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतेही महाराष्ट्रात येऊन गेले. खुद्द पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रभर दौरे केले, विविध ठिकाणी सभाही घेतल्या. गेल्या आठवड्यात मुंबईत त्यांची शेवटची सभाही झाली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे 14 नोव्हेंबरला सभा घेतली. मात्र त्यांच्या या सभेला महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, चर्चांनाही उधाण आलं.

महायुतील पक्षांमध्ये अनेक मुद्यावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. धर्मयुद्धावरून महायुतीमध्येच युद्धाची स्थिती आहे. कटेंगे तो बटेंगे हे महायुतीच्या नेत्यांचं विधान अजित पवारांना मान्यच नसल्याचं स्पष्ट दिसंलय. त्याचत पंतप्रधानांच्या सभेलाही त्यांची अनुपस्थिती होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मुंबईत आलेले असताना, त्यांची शिवाजी पार्कवर सभा असतानाही अजित पवार का गेले नाहीत, युतीत सगळं आलबेल आहे ना असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. मात्र या सर्व प्रश्नांचे आता खुद्द महायुतीतील प्रमुख नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट उत्तर दिलंय. अजित पवार हे मोदींच्या सभेला का आले नाही, याचा खुलास खुद्द फडणवीसांनीच केला आहे. TV9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले…

पंतप्रधानांनीचं सांगितलं यायची गरज नाही…

पंतप्रधान मोदींच्या मंचावर अजित पवार गेले. आम्ही ठरवलं होतं. ( पंतप्रधानांच्या) पहिल्या सभेला मी गेलो होतो, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार नव्हते. दुसऱ्या सभेसाठी मुख्यमंत्री गेले होते, तेव्हा मी आणि दादा ( अजित पवार) नव्हते. त्यानंतर एका सभेला अजित पवार गेले होते, तेथे मी आणि मुख्यमंत्री नव्हतो. एवढंच नव्हे तर एका सभेला फक्त तटकरे गेले होते, आमच्या तिघांपैकी ( फडणवीस, शिंदे, अजित पवार) कोणीच नव्हतं.
असं आम्ही ठरवून घेतलं होतं. कारण खुद्द पंतप्रधानांनी आम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही सगळे ( सभेला) याल तर तुमच्या सभा होऊ शकणार नाहीत. सगळ्यांनी यायची गरज नाही, प्रत्येकाने सभा वाटून घ्या, त्याप्रमाणेच आम्ही सभा वाटून घेतल्या, असं देवेंद्र फडणवीसांनी स्प्षट केलं. मोदीजींच्या सभेत राष्ट्रवादीच प्रमुख नेते, तटकरे, भुजबळ , प्रफुल पटेल हेही होते, त्यांनी सर्वांनी भाषणही केलं, असं सांगत फडणवीसांनी या मुद्यावरूर होणाऱ्या चर्चेला थेट उत्तर दिलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us