Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार

Monsoon Arrives in Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता... अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार
Monsoon Arrives in Maharashtra
Image Credit source: Google
| Updated on: Jun 06, 2026 | 3:23 PM

मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मान्सून तळकोकणात दाखल

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून केरळमध्ये 3 दिवस उशिरा म्हणजेच 4 जून दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनची गती वाढली आहे. काल मान्सून कर्नाटक, तामिळनाडूमध्ये पोहोचला होता. त्यानंतर आज मान्सून कोकण आणि गोव्यात दाखल झाला आहे. आता मान्सून वेगाने प्रगती करत आहे, त्यामुळे तो लवकरच उत्तरेकडे सरकून मुंबईसह राज्याच्या विविध भागात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना फायदा होणार

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागातील हवामानात मोठा बदल झाला होता. आधी तीव्र उष्णतेनंतर आता काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. यामुळे काही भागात तात्पुरता गारवा निर्माण झाला होता. मात्र या पावसामुळे शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशातच आता मान्सून अधिकृतपणे राज्यात दाखल झाला आहे. आता मान्सून उत्तरेकडे सरकून लवकरच संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पाऊस पडल्यानंतर पेरण्यांच्या कामांनाही वेग येणार आहे.

आज अनेक भागात पावसाची शक्यता

दरम्यान, राज्यासह दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 जून रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत 25 जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow Us