राज्यातील मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला; कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा? जाणून घ्या
महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस सुरु आहे. याचा सकारात्मक परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

राज्यातील गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गोदावरी पात्रातील दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे. या मुसळधार पावसादरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. राज्यातील जलाशयांचा पाणीसाठा झपाट्याने वाढल्याचे समोर आलं आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा आहे, जाणून घेऊयात.
राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठा वाढू लागला आहे. राज्यातील एकूण 3029 धरणांत एकूण साठवण क्षमतेच्या 53.38 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. त्याचा परिणाम यंदाच्या पाणीसाठ्यावर पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत सर्व जलाशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या 63.42 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत पाणीसाठ्यामध्ये 10.04 टक्क्यांचा फरक पाहायला मिळत आहे.
कोकणात सर्वाधिक जास्त पाणीसाठा
कोकण विभागातील जलशयांत आजच्या तारखेपर्यंत सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. कोकणातील जलाशयांमध्ये 76.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर पुण्यात 65.27 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. नाशिकमध्ये 55.11 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर नागपूर आणि अमरावतीत अनुक्रमे 46.71 टक्के आणि 42.91 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु यंदा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जलाशयात केवळ 25.44 टक्के पाणीसाठा झाला आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक कमी पाणीसाठा
कोकण आणि पुण्यातील धरणांत अनुक्रमे 77.19 टक्के आणि 70.15 पाणीसाठा झाला आहे. कोकणातील मध्य श्रेणीच्या धरणांत 77.06 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तर छोट्या श्रेणीच्या धरणात 73.06 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे . छत्रपती संभाजीनगरमध्ये 32.70 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर छोट्या धरणांत 13.86 टक्के पाणीसाठा जमा झालाय. काही दिवसांपूर्वी पाऊस पडूनही मराठवाड्यातील जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी जमा झाला आहे.
