दोन गतिमंद मुलं, 25 वर्षांपूर्वी नवऱ्याने टाकलं, जीवाचं रान करणाऱ्या आईने शेवटी हात टेकले, कोरोनाची दाहकता सांगणारी करुण कहाणी

| Updated on: Jun 02, 2021 | 12:04 AM

हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथे राहणाऱ्या अन्नपूर्णा धुळे यांना कोरोना महामारीमुळे जगणं मुश्कील झालं आहे. (annapurna dhule hingoli district corona pandemic)

दोन गतिमंद मुलं, 25 वर्षांपूर्वी नवऱ्याने टाकलं, जीवाचं रान करणाऱ्या आईने शेवटी हात टेकले, कोरोनाची दाहकता सांगणारी करुण कहाणी
HINGOLI ANNAPURNA MOTHER
Follow us on

हिंगोली : कोरोना महामारीने (Corona pandemic) अनेकांना आयुष्यातून उठवलं. अनेकांचं कधाही न भरुन निघणारं नुकसान झालं. नोकरी गेल्यामुळे तर कित्येक लोक बेरोजगार झाले. मात्र, कोरोना विषाणूच्या दाहकतेची अशी काही उदाहरणं आहेत, ज्यांना पाहून थरथरायला होतं. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथे राहणाऱ्या अन्नपूर्णा धुळे (Annapurna Dhule) यांची कहाणी अशीच काहीशी आहे. कोरोना महामारीमुळे त्यांचं तसेच त्यांच्या दोन गतिमंद मुलांचं जगणं मुश्कील झालं आहे. (mother Annapurna Dhule from Hingoli district facing problems amid Corona pandemic who takes care of her child since 25 years)

काम नसल्यामुळे समोर अनेक प्रश्न

पिंपळदरी येथे राहणाऱ्या अन्नपूर्णाबाई मागील 25 वर्षांपासून आपल्या दोन गतिमंद मुलांचा सांभाळ करतात. दोन्ही मुलं गतिमंद असल्यामुळे त्यांचा नवरा त्यांच्यासोबत राहत नाही. नवरा सोडून गेला म्हणून न डगमगता त्या मागील 25 वर्षांपासून काम करत आहेत. पैसे जास्त मिळावेत म्हणून त्यांनी आतापर्यंत पुरुषांचे काम केले. आपल्या दोन गतिमंद मुलांच्या उपचारासाठी त्या जीवाची बाजी लावून अजूनही लढत आहेत. मात्र, आता लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध होत नाहीये. परिणामी पैशांची चणचण भासत असल्यामुळे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

25 वर्षांपासून 2 गतिमंद मुलांचा सांभाळ

पुरुषांना लाजवेल असे कष्ट उपसणाऱ्या अन्नपूर्णा यांना राहुल आणि देविदास अशी 2 गतिमंद मुले आहेत. गतिमंद असल्याने त्यांना काहीच कळत नाही. आई हेच त्यांचं विश्व आहे. अन्नपूर्णा त्यांचं सगळं काही काम करतात. या मुलांना अंघोळ घालणं, जेवण भरवणं, त्यांची वाढलेली दाढी, तसेच केस कापणे अशी सगळी कामं या अन्नपूर्णाच करतात.

अन्नपूर्णा यांचे दोन गतिमंद मुलं

शासनाकडे मदत मागितली, पण अर्ज नामंजूर

अन्नपूर्णाबाई मागील 25 वर्षांपासून गावात मिळेल ते काम करतात. काम करुन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मुले गतीमंद असल्याने ते आईला कामात मदतदेखील करू शकत नाहीत. त्यामुळे एकट्या अन्नपूर्णाबाईंवरच सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे. शासनाच्या निराधार योजनेमध्ये अनुदान मिळण्यासाठी त्यांनी वेळोवेळी औंढा नागनाथ तहसील कार्यालयात अर्ज केले. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी काढून त्यांचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. शेवटी त्यांनी शासनाच्या मदतीचा अपेक्षा सोडली आणि स्वत:च्या मनगटाच्या जोरावर परिस्थितीशी लढण्याचा निश्चय केला. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या संसाराचा गाडा हाकला. पण कोरोनामुळे आता त्या हतबल झाल्या आहेत.

मुलांच्या उपचारासाठी महिन्याला 2 हजार रुपये

राहुल आणि देविदास यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना महिन्याला 2 हजार रुपयांच्या गोळ्या, औषधी लागतात. अन्नपूर्णा यांनी एक आई म्हणून जे जे करता आलं ते केलं. अतोनात परिश्रम घेतले. पण आता परिस्थितीपुढे त्यांनी हात टेकले आहेत. सध्या कोरोना महामारीचे दिवस आहेत. या काळात काम नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या गतिमंद मुलांचं काय याचीच चिंता त्यांना भेडसावतेय.

इतर बातम्या :

मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन ठाण्यात विवाहितेचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात दिवसभरात 133 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 3 जणांचा मृत्यू

(mother Annapurna Dhule from Hingoli district facing problems amid Corona pandemic who takes care of her child since 25 years)