Sanjay Raut-Raj Thackeray : मोठी बातमी, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर, नेमकं काय घडतंय?

Sanjay Raut-Raj Thackeray : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच अचानक खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Sanjay Raut-Raj Thackeray : मोठी बातमी, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर, नेमकं काय घडतंय?
Sanjay Raut-Raj Thackeray
| Updated on: Jun 05, 2026 | 12:44 PM

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच अचानक खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या दादर शिवाजी पार्कमधील निवासस्थानी संजय राऊत दाखल झाले आहेत. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचं कारण काय? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महायुतीने 17 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. जळगाव, नाशिकमध्ये बंडखोरी झाल्याने पेच वाढला आहे. या निवडणुकीत महायुतीमध्येच सामना आहे. महाविकास आघाडी या स्पर्धेत कुठेही दिसत नाहीय. आज संजय राऊत यांनी या निवडणुकीवरुन काही आरोप केले होते.

कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या एका हॉटेलमध्ये दिले, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला. कोकणातून उद्धव ठाकरे गटाचे बाळ माने महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पण संख्याबळ नसल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अनिकेत तटकरेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यावरुन संजय राऊत यांनी आरोप केला. आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेण्यामागे हे कारण आहे की, अजून काही ते स्पष्ट झालेलं नाही.

सहा जागांवर समाधान मानावं लागलं

संजय राऊत हे दोन्ही ठाकरे बंधुंमधील दुवा मानले जातात. मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी दोन्ही ठाकरे बंधुंना एकत्र आणण्यात संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मराठी मतांची फाटाफूट होऊ नये ही त्यामागे भूमिका होती. दोन्ही ठाकरे बंधुंनी राजकारणात एकत्र यावं ही अनेक वर्षांची इच्छा त्यामुळे पूर्ण झाली. पण महापालिकेत ठाकरे बंधुंना सत्ता आणता आली नाही. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने मुंबईत 65 जागा जिंकल्या. राज ठाकरे यांच्या पक्षाला सहा जागांवर समाधान मानावं लागलं.

सध्या तरी ठाकरे बंधुंच्या आघाडीवर शांतता

या निवडणुकीआधी ठाकरे बंधु बऱ्याचवेळा एकत्र दिसले. दोघांनी एकत्र शाखांना भेटी दिल्या. शिवतीर्थ आणि मातोश्रीवर दोघांचं येणं-जाणं वाढलं होतं. पण निवडणूक निकालानंतर तितका एकोपा दिसला नाही. सध्या तरी ठाकरे बंधुंच्या आघाडीवर शांतता आहे. राज ठाकरेंनी सुद्धा या विधान परिषद निवडणुकीवर काही भाष्य केलेलं नाही.

 

 

 

Follow Us