
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय’ “राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तीने वाचल्याशिवाय त्यावर बोलू नये” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पार्थ पवारला तुम्ही डिफेंड केलं होतं? त्यावर त्या म्हणाल्या की, “हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मी पार्थला फोन केला होता. तेव्हा त्याने मला सांगितलेलं आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही. मी नंतर तुला समजावून सांगतो. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटतं चौकशीचा कागद येईपर्यंत थांबलं पाहिजे”
“हा विषय कोर्टात आहे. कोर्ट काय निर्णय देतं? यावर कसं बोलणार. या देशात कोर्टाने दिलेले निर्णय मान्य करायचे असतात. तो अहवाल, कोर्टाची फायनल ऑर्डर येईपर्यंत बोलणं योग्य होणार नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “पार्थ पवारांवर माझा विश्वास आहे. काही चुकीचं केल नाही असं पार्थ म्हणाला होता” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर त्या म्हणाल्या की, “दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले. माझा भाऊ राहिला नाही, आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नाही”
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली आहे
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा होता, या काळात अल्पसंख्यांक विभागाकडून प्रमाणपत्र जारी करण्यात आली. या प्रकरणावर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली आहे. आज सकाळीच मी या विषयी वर्तमानपत्रात वाचलं. तुमच्या तत्परतेमुळे मीडियाचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही हा सर्व घोटाळा उघड केला. त्यावर चौकशी लावण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर स्टेटमेंट दिलं पाहिजे. नक्की काय झालं, याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राची बाहेर बदनामी होते
प्रशासनावरचा वचक कमी झालाय. मलिदा खाण्याची वृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढतेय यावर सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्या बोलल्या की, “दुर्देवी घटना आहे. महाराष्ट्राच प्रशासन देशात उत्तम राहिलेलं आहे. महाराष्ट्राची बाहेर बदनामी होते. अलीकडे सगळा मिडिया अलर्ट झालाय. सगळ्या भाषेत बातम्या पोहोचतात. महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या प्रशासनाची बदनामी होते”