
विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारच्या बोळींज येथील सुपर होम या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विरारच्या बोळींज येथील सुपर होम या इमारतीवरून उडी मारून 2 कॉलेज तरुणांनी आत्महत्या केली आहे. शाम सनद घोरुई (वय 20) आणि आदित्य राम सिंग (वय 21) अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. हे विध्यार्थी नालासोपारा च्या राहूल इंटरनॅशनल मध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.
दोन विद्यार्थ्यांनी या इमारतीवरून आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी यो दोन तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही हत्या की आत्महत्या याचा शोध अर्नाळा पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने विद्यार्थ्याच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोघे नालासोपारा परिसरातील अचोले येथील रहिवासी आहेत. ते नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल कॉलेजमध्ये कॉमर्सच्या अंतिम सत्रात शिकत होते. आत्महत्येनंतर पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या घटनेनंतर आता पोलीसांनी अधिकचा तपास सुरु केला आहे. या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केली? यामागील कारण काय आहे? ते नैराश्येत होते का? त्याच्यावर काही दबाव होता का हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. या प्रश्नांची उत्तरे समोर आल्यानंतर आत्महत्येचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.