
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मुंबईला भाजपचा महापौर मिळाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा दिली आहे. आज मुंबई महापालिका महापौरपदाची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांची वर्णी लागली आहे. या निवडीमुळे मुंबई महापालिकेवर आता महायुतीची सत्ता अधिकृतपणे प्रस्थापित होणार आहे. प्रशासकीय राजवट संपवून लोकप्रतिनिधींचे राज्य पुन्हा सुरू झाल्याने मुंबईच्या राजकारणात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
आम्ही कायम एनडीएमध्ये राहणार आहोत, असे सुनिल तटकरे म्हणाले. तसेच विलीनीकरणासंदर्भात आण्चया पक्षाच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.
मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाल्यानंतर, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी आज दादर येथील चैत्यभूमीवर हजेरी लावली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हे सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधी दादरमध्ये दाखल होत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर महामानवाचे आशीर्वाद घेऊनच आपल्या नवीन कारकिर्दीची सुरुवात या नगरसेवकांनी केली आहे.
यवतमाळ : गोवा व मध्य प्रदेश या राज्यातील देशी-विदेशी बनावट मद्द वर्धा जिल्ह्यात जात असताना यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले आहे. या कारवाईत 1 कोटी 5 लाख 35 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
जळगाव–संभाजीनगर महामार्गावर महाराणा प्रताप चौफुलीवर भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट चहाच्या टपरीवर उभ्या नागरिकांना धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर अपघातग्रस्तांना न्याय मिळावा, तसेच महामार्गावर उपाययोजना कराव्यात यासाठी संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
अकोला महानगरपालिकेच्या कचरा घंटागाड्या चालविणाऱ्या चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून संपाचा मार्ग अवलंबत महानगरपालिका समोर आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कचरा संकलन व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी आमदार माऊली कटके यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी आमदार कटके यांनी दादांच्या विकास स्वप्नांना पुढे नेत जिल्ह्यासह आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले. तसेच पराभूत उमेदवारांनीही खचून न जाता जनतेच्या सेवेसाठी कामाला लागावे, असा सल्ला त्यांनी दिला.
पुण्यात नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिली बैठक… सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत उद्या पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक… बैठकीत पुण्याच्या जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता दिली जाणार..
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग….सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करणार….. सूत्रांची माहिती…. राजीनामा देण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांसोबत चर्चा…यावेळी दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरदेखील चर्चा होणार असल्याची माहिती….
चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना-भाजपची सत्ता. चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत चर्चा करत होतो पण काँग्रेसकडून वारंवार अपमान करण्यात आला असल्याचं संदीप गिर्हे यांनी म्हटलं आहे.
नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ. बोलण्याची संधी न दिल्याने काँग्रेस नगरसेवक आक्रमक. आज मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान होताच हा गोंधळ सुरु झाला आहे.
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान… 44 वर्षानंतर मुंबईत भाजपचा महापौर… तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड…
मुंबईकरांनी महायुतीला कौल देऊन विकासाला स्वीकारलं आहे. मुंबईकरांना विकास हवा आहे. मुंबईकर विकासापासून वंचित होते. मुंबईकरांनी कामाची पोचपावती दिली आहे. मुंबईकरांसाठी जे जे आवश्यक आहे, ते आम्ही निश्चितच करू. महायुतीच्या कामांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला आहे, असं फडणवीस म्हणाले.
या सभागृहाचं कामकाज पहिल्यांदाच पाहिलं आहे. महापौर, उपमहापौर हे मुंबई पालिकेला एक दिशा देतील. जनतेला लोकशाहीचं राज्य अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू. रितू तावडे या अनुभवी असून त्यांच्या रुपात अस्सल मराठी चेहरा मिळाला आहे. मुंबईत महापालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान झाले आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली, तर शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर नियुक्त झाला आहे.
नाशिक- खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना सक्ती केल्याने मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी खाजगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप दिला. नाशिकच्या शरणपूर रोड ‘फिजिक्स वाला’क्लासेसमधील हा प्रकार आहे. मराठी भाषेत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनर्सलेस असल्याचं क्लासमधील कर्मचाऱ्यांकडून हिणवलं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
पंढरपूर- माझ्या हत्येच्या कटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी म्हटलंय. माळशिरस तालुक्यात 3 दिवसांपासून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. भविष्यात माझ्या जीवाला काही झालं तर जबाबदारी कुणाची याबाबतची आपण चिठ्ठी देवाभाऊ आणि जयभाऊ यांना दिली असंही राम सातपुते म्हणाले.
जालन्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मैदानी चाचणीसाठी सकाळपासूनच उमेदवार ग्राउंडवर हजर आहेत. 156 जागांसाठी जालना पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरु आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा आज थाटात संपन्न झाला. यावेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि पालिका आयुक्त राधाबीनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात पार हा सोहळा पडला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात त्या मोदींना भेटल्या. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे , जय आणि पार्थ पवार हेही उपस्थित होते.
यवतमाळ- दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी विदेश दारू जप्त करण्यात आली. एक कंटेनर, चारचाकी किया वाहन व मालवाहू चारचाकी वाहन, असा 1 कोटींवर मुद्देमाल जप्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातून दररोज वर्धा जिल्ह्यात देशी विदेशी दारू जात असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक विदेशी मद्यांचे डुप्लिकेट स्टिकरही जप्त करण्यात आले.
महामार्गावरील अपघातात अनेकांचे जीव गेल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. गावालगत असलेल्या महामार्गाला भुयारी मार्ग देण्याच्या मागणीसाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. नांदेडच्या दाभड येथे गावकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. तब्बल एक तासापासून रास्ता रोको आंदोलन केल्याने नांदेड – हिंगोली महामार्ग ठप्प आहे.
भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत केलं आहे. पुण्यातील एकूण ६९ कार्यकर्त्यांच निलंबन करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर मोठा निर्णय घेण्याता आला आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केल आहे. पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचनाही केल्या आहेत.
आदल्या दिवशी एक विमान सूरतला जाचं आणि ते विमान दादांसाठी येतं.. असं म्हणत संजय राऊत यांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केला… अशी कोणती फाईल आहे, ज्या फाईलवर ,सही हवीच होती… असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात एक लक्षवेधी बॅनर झळकले. बॅनरवर “तुमच्या विना विजय अधुरा आहे… दादाच्या चरणी हा विजय समर्पित” असा मजकूर बॅनरवर लिहिलेला आहे. जिल्हा परिषद निकालानंतर लगेचच लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे भावनिक वातावरण निर्माण निर्माण झालं आहे. धाराशिव जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सहा जागा तर पंचायत समितीला अनेक ठिकाणी सदस्य निवडून आले आहेत.
पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये मागील ३ दिवसांपासून शरद पवार यांना एडमिट करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ उपचार करत आहेत. त्यांची काळजी घेत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस टाकून त्यांचे आभार मानले आहेत.
बीड जिल्हा पोलिस दलात रिक्त 174 पदांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 18 तारखेपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. आठ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शी व्हावी याकरिता जिल्हा पोलीस दल वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.
विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. रोहित पवार अभ्यासू नेते. चौकशीची मागणी योग्य दिशेने नेण्यासाठी प्रयत्न असं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेत आज महापौर निवडणूक पार पडणार. शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक आज महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणार. महापौर निवडणूक झाल्यावरती, शिवसेनेचे सर्व नगरसेवक बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती असलेल्या पुतळ्याजवळ जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करणार.
पुण्यात लोहियानगरमध्ये तलवार काढून आणि दगडफेक करत दहशत. हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ वायरल. हातात तलवारी आणि दगडफेक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल. कशामुळे दगडफेक आणि तलवारी फिरवल्या याचा तपास सुरू. अधिक तपास पोलिस करत आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला १९, शिवसेनेला १५ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) ६ जागा मिळाल्याने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत यांच्या गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्षाला विरोध असल्याची चर्चा आहे. परिणामी, तानाजी सावंत गटाला सत्तेतून बाजूला ठेवून शिवसेनेतील दुसऱ्या गटाच्या मदतीने भाजप सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक सदस्य सहलीवर गेल्याने आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे धाराशिव जिल्हा परिषदेत आता भाजप नेमकी कोणाशी हातमिळवणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार नगर परिसरातील एका सोसायटीत विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हुक्का पार्लरचा मालक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून १२,४९५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. रहिवासी भागात अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याने पोलिसांनी आता अशा ठिकाणांवर आपली नजर अधिक कडक केली आहे.
राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला मिळणारे वस्तू व सेवा कर (GST) आणि मुद्रांक शुल्काच्या अधिभारापोटीचे अनुदान मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याने पालिकेच्या तिजोरीवर ताण पडत आहे. सध्या एकूण ३ हजार ६९ कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. हा मोठा निधी अडकल्याने शहराच्या नियोजित विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रलंबित अनुदान तातडीने मिळावे यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील १७१ रिक्त पदांसाठीच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये ११८ पुरुष आणि ५३ महिला पदांचा समावेश असून, पोलीस कवायत मैदानावर पहाटे ५ वाजेपासूनच उमेदवारांनी गर्दी केली होती. यंदाच्या भरतीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रथमच उंची आणि छाती मोजण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. संपूर्ण मैदान सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून प्रत्येक हालचालीचे चित्रीकरण केले जात आहे. दररोज ५०० उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी घेतली जाणार असून, पुढील नऊ दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळत असून नगरपंचायत आणि महापालिकांनंतर आता पुणे जिल्हा परिषदेतही महिलाराज अवतरले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ गटांपैकी तब्बल ४२ गटांमध्ये महिला उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुरुषांची संख्या ३१ पर्यंत मर्यादित राहिली आहे. बदलत्या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गज पुरुष सदस्यांची संधी हुकल्याने त्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या आरक्षित जागांमुळे आणि मतदारांच्या कौलामुळे जिल्हा परिषदेत प्रथमच महिलांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. निवडून आलेल्या ४२ महिलांमध्ये अनुभवी नेत्यांसह अनेक तरुण आणि उच्चशिक्षित चेहऱ्यांचा समावेश असल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारात आता महिलांची छाप दिसणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचे धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये राज्यभरात एकूण ४२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक २२ प्रकरणे अमरावती विभागात, तर पुणे विभागात १० प्रकरणांची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ६००० कोटी रुपयांचे कर्ज ‘हुडको’कडून (HUDCO) घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी ९६ टक्के शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास संमती दर्शवली आहे. १ जूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया सामंजस्याने पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच, विमानतळाच्या जलद विकासासाठी एक विशेष हेतू कंपनी (SPV) आणि स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यावरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय प्रकल्पातील अडथळे दूर झाले आहेत.
मिरा-भाईंदर शहरात ओल्ड पेट्रोल पंप परिसरात एका मद्यधुंद कार चालकाने भीषण अपघात घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्यावरच पलटी झाली. प्राथमिक माहितीनुसार, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात घडला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.