डोंबिवली स्टेशनवर जीवघेणा थरार… लोकलमध्ये चढताना तरुण प्लॅटफॉर्मवर पडला अन्…

Mumbai Local : मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचंड गर्दीमुळे एक तरुण फलाटावर कोसळला होता, मात्र सह प्रवाशांमुळे त्याचा जीव वाचला आहे.

डोंबिवली स्टेशनवर जीवघेणा थरार... लोकलमध्ये चढताना तरुण प्लॅटफॉर्मवर पडला अन्...
Local Accident
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 25, 2026 | 5:40 PM

मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. दिवसाच्या कोणत्याही वेळी प्रवास करायचा म्हटलं तरी लोकलमध्ये तुफान गर्दी पहायला मिळते. त्यामुळे अनेक अपघात देखील घडतात. अशातच आता मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचंड गर्दीमुळे एक तरुण फलाटावर कोसळला होता. मात्र इतर प्रवाशांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. हा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमके काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

डोंबिवली स्टेशनवर तरून खाली पडला अन्…

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दीमुळे पुन्हा एकदा अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर सकाळी 7 वाजून 28 मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल येत असताना एका तरूणाचा जीव थोडक्यात वाचला आहे. गाडी फलाटावर येताच नेहमीप्रमाणे मोठी गर्दी उसळली. यावेळी एका तरुणाने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता तोल जाऊन तो थेट फलाटावर पडला.

घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद

या घटनेनंतर क्षणभरासाठी सर्व प्रवाशांचा थरकाप उडाला. सुदैवाने जवळ उभ्या असलेल्या प्रवाशांनी तत्काळ त्याला हात देत वर खेचले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण प्रकार त्या वेळी गर्दीचा व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या गणेश अरुण कदम यांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. दैव बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला आहे.

लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी

गेल्या काही दिवसांपासून कल्याण ते ठाणे दरम्यान लोकल प्रवास करताना अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. याआधी मुंब्रा आणि कळवा दरम्यान गर्दीमुळे पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. एकीकडे 15 डब्यांच्या लोकल गाड्या वाढवण्याची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात कल्याण-डोंबिवली आणि परिसरातून मुंबईकडे जाणारे हजारो प्रवासी आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. सकाळच्या गर्दीत प्रत्येक प्रवास भीतीनेच करावा लागतो, अशी भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त लोकल गाड्या सुरू कराव्यात, 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवावी आणि गर्दी नियोजनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.