देश विकायला काढला, मुंबई विकायला काढली, एवढी हिंमत आली कुठून? राज ठाकरे मुंबईत कडाडले

मुंबई महपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त प्रचार सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देश विकायला काढला, मुंबई विकायला काढली, एवढी हिंमत आली कुठून? राज ठाकरे मुंबईत कडाडले
Raj Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 8:56 PM

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं युती केली आहे, तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.  आज मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. तंत्र माहीत होतं तेव्हा हा माज येतो. मुंबई विकायला काढली. देश विकायला काढला,  असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

आम्ही एकत्र येण्याचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट.  अनेक वर्ष मी यावर बोलत आलो, कशा प्रकारचा डाव रचला जातो? राज्य सरकारने मध्यंतरी हिंदी सक्तीचा प्रस्ताव आणला. मी कडाडलो आणि उद्धव ठाकरेही कडाडले. त्यावेळी मुलाखत झाली, त्यामध्ये मी म्हणालो कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून या गोष्टीची सुरुवात झाली. तो हिंदी सक्तीचा विषय तुम्हाला चाचपडून पाहण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस जिवंत आहे का? फक्त चाचपडणं होतं तुम्हाला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला काय फेफरं आलं माहीत नाही. मनाला वाटेल ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कुणाला विचारायचं नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटलं म्हणून केलं. हे कोण आहेत लोकं?  असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पैसे फेकले की विकत घेऊ, आला कुठून एवढा आत्मविश्वास? काँग्रेस सत्तेवर होती, अनेक लोक सत्तेत होती. पण ते लोकांना घाबरून असायचे. जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहित धरून टाकलंय तुम्हाला. कुठून येतात मतं यांच्याकडे कशी येतात? हे सर्व ठिकाणी सुरूच आहे. बोगस व्होटर आणि ईव्हीएम मशीनच्या लढाया सुरू आहेत.  अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर भाजपने युती केली. ६६ जणं बिनविरोध निवडून आले, त्यांना मतदानच करू दिलं नाही. आज ६६ आहेत, उद्या आकडे वाढत जाणार. त्यांना कळलंय लोकांना कसंही विकत घेऊ शकतो. विकले जातात याचं वाईट वाटतं. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे ड्रग्स रॅकेटमधील माणसाला भाजपने तिकीट दिलं. तुमच्या नाकावर टिच्चून, बदलापूरमध्ये तुषार आपटे बलात्काराचा आरोपी त्याला नगरसेवक केलं. आली कुठून एवढी हिंमत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.

 

Follow Us