Mumbai Pune Missing Link : आता 90 मिनिटात पोहोचा पुण्यात, मुंबई-पुणे प्रवास होणार सुस्साट; कसा आहे मिसिंग लिंक?

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असून, लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका मिळणार आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा हा अद्भुत नमुना असून, यामुळे मुंबई आणि पुणेकरांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे, तसेच राज्याच्या विकासाला गती मिळेल.

Mumbai Pune Missing Link : आता 90 मिनिटात पोहोचा पुण्यात, मुंबई-पुणे प्रवास होणार सुस्साट; कसा आहे मिसिंग लिंक?
कसा आहे मिसिंग लिंक?
| Updated on: May 01, 2026 | 11:30 AM

मुंबई आणि पुणेकरांसाठी मोठी आनंदाचा बातमी आहे. मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे. मिसिंग लिंकचे आज महाराष्ट्र दिनी लोकार्पण होत आहे. खालापूर टोल प्लाझापासून तीन किलोमिटर अंतरावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या मिसिंग लिंकमुळे वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होणार आहेच, पण अर्धा तास वेळेची बचत होणार आहे. म्हणजे पुण्याला जाणाऱ्या मुंबईकरांचा आणि पुण्याहून मुंबईला येणाऱ्या पुणेकरांचा अर्धा तास वाचणार आहे. त्यामुळे हा मिसिंग लिंक पुणे आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

90 मिनिटात पुण्यात, पेट्रोल-डिझेलचीही बचत

या मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट 2018 मध्ये सुरू झालं. हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटातील कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. अनेक अडथळे, भौगोलिक परिस्थिती अशा कारणांमुळे हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक ठरले होते. 6,695.37 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांची बचत होणार आहे. म्हणजे मुंबईहून पुण्याला अवघ्या 90 मिनिटात पोहोचता येणार आहे. तसेच 20 टक्के पेट्रोल आणि डिझेलचीही बचत होणार आहे.

आव्हानात्मक पण…

हा मिसिंग लिंक यासाठी विशेष आहे, कारण इथे काम पुर्ण करताना कामगारांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा मोठं आव्हान होतं. तसेच विविध प्रकारच्या खडकांचे परीक्षण आणि योग्य उपाययोजना करत त्याचे भुयारीकरण करताना ब्लास्टिंग, डोंगराळ भागातील तीव्र चढउतार, खंडाळ्यातील घनदाट जंगल आणि मुसळधार पाऊस, या सगळ्यांचा योग्य विचार करून निर्णय घ्यावा लागला. उंचीवर काम करताना वाऱ्याचा दाब, केबल स्टेड पुलापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून पोहोचत रस्त्याचं बांधकाम, अशी अनेक आव्हाने पार करण्यात आली आहेत.

थोड्याच वेळात लोकार्पण

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक सुरक्षित, इंधन वाचवणारा, वेगवान आणि विनाअडथळा होणार आहे. प्रवाश्यांची 30 मिनिटांची बचत होणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचे उद्घाटन होणार असून केंद्रीय सहकार तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला तसेच बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विक्रम नोंदला

हा प्रकल्प केवळ रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे.

मिसिंग लिंकची वैशिष्ट्यं

केबल-स्टेड ब्रिज : प्रकल्पात 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज असून त्याच्या पूल पायलॉन  उंची 182 मीटर आहे, जो भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील पूल ठरला आहे.

वेळेची बचत : घाट क्षेत्रातील वळणावळणाचे रस्ते आणि वाहतूक कोंडी टाळल्यामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील रहिवाशांची आणि मुंबई-पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा या मिसिंग लिंकमुळे आता संपणार आहे.

 

Follow Us