Aaditya Thackeray : स्वत:ला विजनरी, इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब? आदित्य ठाकरेंचा सवाल
Aaditya Thackeray : "स्वत:ला विजनरी, इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? हा प्रश्न आहे. त्यांनी खाल्लेला पैसा हा माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे" अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यंदाच्या मोसमातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. महत्त्वाच म्हणजे जून महिना सुरु होण्याआधीच मे च्या शेवटच्या आठवड्यात हा धुवाधार पाऊस कोसळतोय. मुंबईच हवामान पाहून सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबईची आज तुंबई झाली. मुंबईत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं. मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा कोलमडली. मुंबईच्या या स्थितीवरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
“मुंबईत हा पहिला पाऊस नाहीय. मे च्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडून गेला. साकीनाक्याच्या इथे काय हालत झाली होती, हे आपल्याला माहित आहे. मागच्या आठवड्यात थोडासा रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर अंधेरी सबवे पूर्णपणे भरुन गेला होता. आज मुंबईत तिसऱ्या, चौथ्यांदा पाऊस झालाय” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “मागचे दोन महिने नालेसफाई नीट झालेली नाही. मान्सूनपूर्व बैठका महापालिकेने घेतलेल्या नाहीत. स्वत:ला विजनरी, इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? हा प्रश्न आहे. त्यांनी खाल्लेला पैसा हा माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे” अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
भाजपवर विश्वास ठेवता येणार नाही
“हा पैसा मुंबईकरांचे आज जे हाल झाले, त्यातून काढलेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी मेट्रो 3 च उद्घाटन झालं. तिथे आत जाऊन देत नाहीयत. इमर्जन्सीसारखी स्थिती आहे. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे, ते पहा” अशी टीका आदित्य यांनी केली. “हिंदमाता परिसर 2022 साली आम्ही पूरमुक्त केला होता. हिंदमाता पूर नियंत्रण योजना आणलेली. त्या हिंदमाता परिसरात आज पाणी साचलं आहे. भाजपाची केंद्रात, राज्यात मागच्या 10 वर्षांपासून सत्ता आहे. सर्व यंत्रणा सीएम ऑफिस आणि नगरविकास खात्यातून चालतात. त्या किती निक्क्म्या आणि भ्रष्ट आहेत ते दिसतय. मुंबईकर भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाहीत” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
