मुंबई : इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून टीका-टिप्पण्या सुरु आहेत. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केली. (Accidents do not happen just sitting at home, Bhai Jagtap answer to devendra fadnavis)
“काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असं मत व्यक्त करत देवेंदर फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला. त्यानंतर भाई जगताप यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जगताप म्हणाले की, घरात बसल्यावर अपघात घडत नाही. मामु म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील जनतेच्या समस्या काय कळणार. तो एक अपघात होता. राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही. यामुळे टीका होत असेल पण जनतेचा पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधाततला आक्रोश पंतप्रधानांपर्यंत पोहोचला असेल तर त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा.
काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी ट्वीट करत जगताप यांना खोचक टोला लगावला आहे. “गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!” अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोहोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.
‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!
मा. @BhaiJagtap1 तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंचं करावं!”
असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! pic.twitter.com/dbceBpX6J5— Prasad Lad (@PrasadLadInd) July 10, 2021
एका बैलगाडीवर जेवढे लोक बसू शकतात त्याच्या चारपट ओझे लादून बैलांचा छळ केल्याबद्दल भाई जगताप यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करावा, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणीही कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
(Accidents do not happen just sitting at home, Bhai Jagtap answer to devendra fadnavis)