ग्रामपंचायतींची थकीत वीज बिलांची वसुली आणि वीज तोडणी थांबवा, तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा, अजित पवारांचे आदेश

| Updated on: Jul 20, 2021 | 6:32 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांवरुन सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेत.

ग्रामपंचायतींची थकीत वीज बिलांची वसुली आणि वीज तोडणी थांबवा, तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा, अजित पवारांचे आदेश
Follow us on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांवरुन सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेत. “बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने 15 ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवावी. यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत कराव्यात,” असा निर्णय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज (20 जुलै) घेण्यात आला.

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांवरील दंड आणि व्याज वगळून उर्वरीत रक्कमेच्या 50 टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून महावितरण कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सदर थकित रक्कम 4 हप्त्यात महावितरणला अदा करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरणकडून यानंतरच्या देय थकबाकी रकमेची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.

“पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची वसुली आणि वीज तोडणी थांबवा”

महावितरणने वीज बिलापोटी यापूर्वी प्राप्त झालेल्या थकबाकी रकमेची तपासणी करुन योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अप्पर मुख्य सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करुन 15 ऑगस्टपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल आवश्यक शिफारसींसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत राज्यातील ग्रामीण/स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीजवसुली, तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवावी. तसेच यापूर्वी तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करावी, असाही महत्वपूर्ण निर्णय अजित पवार यांनी घेतला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात, राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकीत वीज देयके व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

नाशिकमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीला 69 हजाराचे वीज बिल, महावितरणचा भोंगळ कारभार उघड

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके 15 व्या वित्त आयोगाच्या देता येणार, हसन मुश्रीफ यांची घोषणा

10 ऑगस्टला देशभरात बत्ती गुल होण्याची शक्यता; सरकारचा एक निर्णय ठरू शकतो कारणीभूत

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar order to stop action on Gram panchayat over pending electricity bill