‘मातोश्री’चं किचन माझ्या हातात म्हणणाऱ्यांमुळे पक्ष सोडला; ठाकरे गट सोडणाऱ्या आशा मामिडी यांचे आरोप काय?

| Updated on: Nov 24, 2022 | 4:57 PM

त्या शिंदे गटातून एमएलसी मागत असल्याचं कळतं. त्या दागिने, कोंबडी वडे आणि साड्यांचे गिफ्ट मागत असतात. त्यावरच त्या समाधानी असतात. आमचं खच्चीकरण केलं जातं.

मातोश्रीचं किचन माझ्या हातात म्हणणाऱ्यांमुळे पक्ष सोडला; ठाकरे गट सोडणाऱ्या आशा मामिडी यांचे आरोप काय?
'मातोश्री'चं किचन माझ्या हातात म्हणणाऱ्यांमुळे पक्ष सोडला; ठाकरे गट सोडणाऱ्या आशा मामिडी यांचे आरोप काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटातील उपनेत्या आशा मामिडी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आशा मामिडी या शिंदे गटात गेल्या आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील महिला नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं म्हणणाऱ्या महिला नेत्याला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं आशा मामिडी यांनी म्हटलं आहे. आशा मामिडी यांनी पक्ष सोडताना त्यांच्या आणि पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्या मनातील खदखदच बोलून दाखवली आहे.

शिवसेना सोडण्याचं दु:ख आहे. पण नाईलाज आहे. शिवसेनेच्या उपनेत्या मीना कांबळी या एका बाईमुळे मी पक्ष सोडत आहे. मीना कांबळी ही गद्दार बाई आहे. मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं सर्व पदाधिकाऱ्यांना ही बाई बोलत असते. म्हणजे रश्मी वहिनींच्या नावावर ही महिला काय काय करत असेल याचा विचार न केलेला बरा, असं आशा मामिडी यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

मीना कांबळी या महिला पदाधिकाऱ्यांकडून गिफ्ट मागतात. मीना कांबळी आणि विशाखा राऊत या पक्ष आपल्याच हातात आहेत, असं वागतात. अनेक महिला या दोघीना कंटाळल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.

मी खूप टेन्शनमध्ये आहे. माझी उद्धव ठाकरेंबद्दल तक्रार नाहीये. रश्मी ठाकरेंबद्दल तक्रार नाहीये. माझं उपनेतेपद डिक्लेअर झाल्यापासून मीना कांबळी यांनी पक्षातील महिलांचं खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. मी पक्षात 35 ते 40 वर्ष काम केल्याचं त्या सांगत असतात. तुम्ही एवढं काम केलं तर काय केलं. दक्षिण मुंबईत 75 टक्के महिला घरी बसल्या आहेत. चिरीमिरीचं काम करत असते. कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करत असते, असा आरोप त्यांनी केला.

मला जबाबदारीने पद दिलं होतं. मी खूश होते. मी तिकीट मागायला गेले नव्हते. पद मागायला गेले नव्हते. मी कामाठीपुऱ्यात काम करत होते. महिला माझ्यासोबत काम करायला येत होत्या. तेव्हा त्यांना अडवलं जायचं. पदावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असंही त्या म्हणाल्या.

त्या शिंदे गटातून एमएलसी मागत असल्याचं कळतं. त्या दागिने, कोंबडी वडे आणि साड्यांचे गिफ्ट मागत असतात. त्यावरच त्या समाधानी असतात. आमचं खच्चीकरण केलं जातं. एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर जेव्हा शिंतोडे उडवले जातात.

तेव्हा महिलांचं खच्चीकरण होतं. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्यासमोर झालं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी मला तेव्हा न्याय दिला नाही. त्यांनी तेव्हाच मला न्याय दिला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.