Kirit Somaiya: सोमय्यावरील हल्ल्याची थेट केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार?; सोमय्या नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 24, 2022 | 10:51 AM

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Kirit Somaiya: सोमय्यावरील हल्ल्याची थेट केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार?; सोमय्या नेमकं काय म्हणाले?
kirit somaiya
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) जोरदार हल्ला चढवला आहे. माझा मनसुख हिरेन (mansukh hiren) करण्याचा प्रयत्न होता. माझ्यावर झालेल्या जीवघेणी हल्ल्याला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हेच जबाबदार आहेत, असं सांगतानाच मी केंद्रीय कॅबिनेट सचिवांशी बोललो. त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या भाजपचं एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांना भेटणार असून झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत नाही म्हणून माझ्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच माझ्यावरील हल्ल्याप्रकरणी संबंधित पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. मी सकाळी केंद्राचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलं आहे. उद्या भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. होम सेक्रेटरी आणि इतरांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे गृहसचिवांशी बोलत आहेत. ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांचं मनसुख हिरेन करण्याचं षडयंत्रं पोलीस आयुक्त संजय पांडेंसह ठाकरे सरकार करत आहे. ज्याला झेड सुरक्षा असूनही जी व्यवस्था खार पोलीस करत नाही. त्याची माहिती केंद्रीय गृहसचिवांना देणार आहोत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

पांडेच जबाबदार

काल खार पोलीस स्टेशन येथे माझ्यावर हल्ला झाला. तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. मी संध्याकाळी पोलीस स्टेशनला कळवलं होतं. मी साडे नऊ वाजता येत आहे हे मी पोलिसांना कळवलं होतं. मी पोहोचण्याआधी 70-80 शिवसैनिक जमले होते. येताना मला शिवीगाळ केली. गाडी थांबवली. परत जाताना पोलिसांना सांगितलं हल्ला करणार आहे. पोलीस म्हणाले, आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप पोलिसांचं. याला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहे. एवढे गुंड कसे काय जमू शकतात?, असा सवाल सोमय्या यांनी केला.

तर माझा डोळा गेला असता

काल सतत मुख्यमंत्री कार्यालयातून खार पोलिसांना फोन जात होते. ही एफआयआर आहे. त्यात यात लिहिलंय. शिवसैनिक 100 मीटर आणि 3 किलोमीटर दूर आहेत. हे पांडेंनी डिक्टेट केलं. माझ्या गाडीवर लांबून दगड आला हे माझ्या नावाने पांडेंनी लिहिलं. मॅनिप्युलेटेड एफआयआर आहे त्यामुळे मी त्यावर सही करणार नाही असं सांगितलं. ही फेक एफआयआर आहे, असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी ही एफआयआर ऑनलाईन पाठवली, असा दावा करतानाच मी चार इंचावर होतो. दगड लागला असता तर माझा डोळा गेला असता, असं ते म्हणाले.