उद्धव ठाकरे यांचं आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी; हिंदू जन आक्रोश मोर्चातून भाजपचा निशाणा

| Updated on: Jan 29, 2023 | 12:53 PM

लव्ह जिहाद विरोधात कायदा करावा हे विरोधकांना का वाटलं नाही. ते सत्तेत होतेच ना? असा सवाल करतानाच हिंदूंची ताकद दाखवण्याची गरज नाही. हिंदूंची ताकद आहेच. पण महिलांवर जो अन्याय होतोय.

उद्धव ठाकरे यांचं आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी; हिंदू जन आक्रोश मोर्चातून भाजपचा निशाणा
hindu jan akrosh morcha
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनायक डावरुंग, गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत सकल हिंदू समाजाने विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिंदे गट आणि भाजपचे नेतेही सहभागी झाले आहेत. मात्र, या मोर्चात ठाकरे गटाचं कोणीही हजर नाहीये. त्यावरून भाजपने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलं आहे. त्यांनी फक्त आता एमआयएमशी युती करायचं तेवढं बाकी आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी या मोर्च्याच्या माध्यमातून केली आहे.

आजच्या या मोर्चाता भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये या मोर्चात सामील झाले आहेत. या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकरही उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

उत्तर देणं हाच पर्याय

महाराष्ट्रातील हिंदू जागा होतोय. हिंदून एकत्र येऊन संदेश देणं गरजेचं आहे. गेल्या तीन वर्षात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. हिंदूंची संख्या कमी होईल याचा प्रयत्न झाला.

मुंबईतील हिंदूंना घरातून पलायन करावं लागलं. या सर्व प्रकाराला एकच उत्तर आहे. ते म्हणजे हिंदूंनी जागं व्हावं. आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणं हा ऐतिहासिक क्षण आहे, असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं.

हिंदू आड येणार नाही

आमच्या माता भगिनींचं लव्ह जिहादमधून आयुष्य खराब करण्यात आलं. लँड जिहादद्वारे वर्चस्व निर्माण केलं तर आम्ही खपवून घेणार नाही. हे सांगणं गरजेचं होतं. महाविकास आघाडीनेही त्यांच्या काळात हिंदूंच्या सणासुदींवरही टाच आणली होती. या सर्व गोष्टींना या मोर्च्यातून उत्तर मिळेल. हिंदूंच्या आडवे कोणी येणार नाही, असं राणे म्हणाले.

फक्त एमआयएमशी युती करणं बाकी

लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं. आता त्यांनी फक्त एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे. हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण करत आहेत, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.

राजकारणाचा प्रश्नच नाही

हिंदू बांधव नाही तर हिंदू भगिनीही इथे आल्या आहेत. आज राजकारण नाही. आम्ही फक्त हिंदू महिला म्हणून आलो आहोत. महिलांच्या मनातील आक्रोश सांगायला आलो आहोत. राजकारणाचा प्रश्नच येत नाही. इतर राजकीय पक्ष आमच्यावर आरोप करणारच. पण लोकांच्या मनात काय आहे हे सांगणं गरजेचं होतं. त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, असं शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.

हिंदुंना ताकद दाखवण्याची गरज नाही

लव्ह जिहाद विरोधात कायदा करावा हे विरोधकांना का वाटलं नाही. ते सत्तेत होतेच ना? असा सवाल करतानाच हिंदूंची ताकद दाखवण्याची गरज नाही. हिंदूंची ताकद आहेच. पण महिलांवर जो अन्याय होतोय, त्यांचा खून केला जातोय. त्यांची फसवणूक होतेय, याविरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.