पॅलेट गनचा आवाज संसदेत घुमणार, निशाण्यावर शाहा, PM मोदींच्या विरोधातही आखलाय प्लान
नीट पेपरफुटी आणि पोलिसांच्या पॅलेट गन, लाठीचार्ज विरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केलीये. विरोधक या मुद्द्यावरून एनडीए सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याची शक्यता

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विरोधक हा मुद्दा संसदेत लावून धरणार असल्याची माहिती हाती आली आहे. नीट पेपरफुटी आणि पोलिसांच्या पॅलेट गन, लाठीचार्ज विरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. विरोधक संसदेत या मुद्द्यावरून एनडीए सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार दिल्लीत शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यांच्यावर पॅलेट गनने गोळीबार केला. त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या साथीने काँग्रेस संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत मोदी सरकारविरोधात आवाज उठवणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी देखील काँग्रेस करणार आहे. जंतरमंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून संसदेत सरकारला बॅकफुटवर आणण्याचा प्लान आहे. सरकारला पावसाळी अधिवेशनच्या उर्वरित दिवसांत कोणताही राजकीय अंजेडा पटलावर मांडता येऊ नये, यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे.
राहुल गांधीही आक्रमक
राहुल गांधी यांनी लोकसभेच्या कामकाजाआधी भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अनेक सवाल उपस्थित केले. तसेच पॅलेट गनचा वापर आणि पोलिसांच्या लाठीचार्जवरून राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. त्यामुळे दोन्ही मुद्दे संसदेत गाजणार आहेत.
राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आंदोलकांवर पॅलेट गनचा वापर करण्याचा आदेश कुणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जंतर-मंतरवर पोलिसांसोबत साध्या वेशात कोण होते? ते पोलीस कर्मचारी होते का? त्यांना लाठीचार्ज करण्याची परवानगी कुणी दिली? असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी अमित शहा यांना केले आहेत. दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राच्या अंतर्गत येते. त्यामुळे या प्रश्नांचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आता या प्रश्नांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
