Kirit Somaiya : रेल्वे स्टेशनबाहेर, चौकात, रस्त्यावर नमाज पठणाला परवानगी दिली तर मग उद्या हे..किरीट सोमय्या यांचा रोखठोक सवाल
Kirit Somaiya : "भविष्यात याचचं उदहारण घेऊन संपूर्ण मुंबईत रस्त्यावर अशा प्रकारे धर्माच्या नावाने दादागिरी सुरु होईल. काही मुस्लिम धर्माध लोक, जिहादी प्रवृत्तीचे नमाज आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा पद्धतीने वागतात"

रस्त्यावरील नमाज पठणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. रस्त्यावरील नमाज पठण बंद करण्याची पत्रातून त्यांनी मागणी केली आहे. मुंबई सारख्या शहरात रस्त्यावर नमाज पठण करायला देणं, ही गंभीर समस्या आहे. रस्त्यावरील नमाज पाठणापासून रोखणं ही मुंबई पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस सहआयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांची ही जबाबदारी असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. रस्त्यावरील नमाज पठण ताबडतोब बंद करण्याची त्यांनी मागणी केली आहे. “अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर नमाज पठण केलं जातं. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शुक्रवारी भर दुपारी वर्किंग डे असतानाही रस्त्यावर, स्टेशनच्या बाहेर, वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे नमाज पठण केले जाते” याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.
“वर्किंग डे, कामाच्या दिवशी, भरदिवसा, दुपारी मुस्लिम समाजाच्या लोकांना अशा प्रकारे लोकांच्या व्यवस्थेमध्ये अडथळा आणण्यााच अधिकार देता येणार नाही” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. “भविष्यात याचचं उदहारण घेऊन संपूर्ण मुंबईत रस्त्यावर अशा प्रकारे धर्माच्या नावाने दादागिरी सुरु होईल. काही मुस्लिम धर्माध लोक, जिहादी प्रवृत्तीचे नमाज आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा पद्धतीने वागतात” असा किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे. “रेल्वे स्टेशनबाहेर, चौकात, रस्त्यावर असं नमाज पठण करायला दिलं, तर मग इतर ठिकाणी का नाही? अशी दादागिरी सुरु होणार” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक जागेवर सोमय्या जाणार का?
मागच्या आठवड्यात बकरी ईदच्यावेळी बकरा कुर्बानीच्या वादातही किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत ते गेले होते. “प्रत्येक जागेवर सोमय्या जाणार का?. आम्ही इथे कुर्बानी होऊ देणार नाही. यापुढे एकाचीही कुर्बानी या ठिकाणी दिली जाणार नाही. कुर्बानीसाठी मुंबई महापालिका त्यांना योग्य ठिकाणी जागा देत आहे. सुरक्षा राखणं हे पोलिसांचं काम आहे. दोन दिवसांपूर्वी हिंदु रस्त्यावर उतरले म्हणुन हे घाबरले” असं किरीट सोमय्या म्हणाले होते.