Sushant Suicide Case | …म्हणून पाटण्याचे एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन, बीएमसीचे स्पष्टीकरण

| Updated on: Aug 03, 2020 | 11:15 AM

देशांतर्गत विमान प्रवाशांच्या नियमानुसार पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण बीएमसीने दिले आहे

Sushant Suicide Case | ...म्हणून पाटण्याचे एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन, बीएमसीचे स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता. (BMC Clarifies on Sushant Singh Rajput death investigation Bihar Police Patna SP Vinay Tiwari allegedly forcibly Home Quarantine)

“बिहार राज्यातून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप 8 विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाला मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड19 संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक होते. त्यामुळे महापालिकेचे पथक काल (2 ऑगस्ट) संध्याकाळी विश्रामगृहावर पोहोचले” असे बीएमसीच्या वतीने सांगण्यात आले.

“महापालिकेच्या पथकाने बिहारहून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असलेली होम क्वारंटाइनबाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाचे दिनांक 25 मे 2020 रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/2020/सीआर 92/डिएसएम 1 अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्‍यक्तींसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली” असे पालिकेने सांगितले.

“राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे, याची त्यांना माहिती देण्यात आली” असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप होत आहे. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीटद्वारे केला.


“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे नेतृत्व करणारे विनय तिवारी. ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत (काल) रात्री 11 वाजता त्यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आले. आता ते कुठेच निघू शकत नाहीत” असा दावा पांडे यांनी ट्विटरवर केला.

“विनय तिवारी यांनी विनंती करुनही त्यांची आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली नाही. ते गोरेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत” असेही पांडे यांनी फेसबुकवर सांगितले. विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.

संबंधित बातमी :

पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप

(BMC Clarifies on Sushant Singh Rajput death investigation Bihar Police Patna SP Vinay Tiwari allegedly forcibly Home Quarantine)