अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या मुंबईतील मॉल्सना टाळे ठोका, स्थायी समितीत जोरदार मागणी

| Updated on: Nov 26, 2020 | 3:39 PM

अग्निसुरक्षा पालन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. (BMC Standing Committee Demand file a case against the fire brigade officer)

अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या मुंबईतील मॉल्सना टाळे ठोका, स्थायी समितीत जोरदार मागणी
या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्यांना ही आग लागल्याचे समोर आले. अवघ्या काही मिनिटातचं ही आग तिसऱ्या मजल्यावर पसरली.
Follow us on

मुंबई : एखादी इमारत धोकादायक असल्याचा कोणी फोन केला तरी अग्निशमन दल कोणतीही शहानिशा न करता इमारत खाली करते. मात्र सिटी सेंटर मॉलच्या आगीनंतर मुंबईतील मॉलच्या तपासणीत करताना अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मॉलमध्ये आग लागून जीवितहानी होण्याची भीती असल्याने हे मॉल तातडीने बंद करावेत. अशा मॉलमध्ये आग लागल्यास अग्निसुरक्षा पालन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. (BMC Standing Committee Demand file a case against the fire brigade officer after Mall fire)

मुंबईतील सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्टोबरला आग लागली. या आगीदरम्यान मॉलमधील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील इतरही मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याने त्यांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते.

त्यानंतर अग्निशमन दलाने 29 मॉलला नोटीस बजावली आहे. मात्र या मॉलवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आग लागून शेकडो लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी हे मॉल बंद करावेत. त्यानंतर मॉलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू केल्यावरच मॉल सुरू करावेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली होती.

नागरिकांच्या जीवाशी अग्निशमन दल खेळत असल्याने कुठेही आग लागल्यास अग्निसुरक्षा पालन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली. मॉलची माहिती मागावताना स्थायी समिती अध्यक्षांचे नाव नोटीसमध्ये टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी रवी राजा यांनी केली.

मॉल सुरू करण्यासाठी राजकीय दबाव 

सिटी सेंटर मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आहेत. मात्र तरीही हा मॉल दोन दिवसात सुरू करावा, या मागणीसाठी काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी दबाव आणत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला.

आग प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या मॉल्सच्या बाहेर हा मॉल अग्निसुरक्षेचे नियम पाळत नाही. त्यामुळे हा विचार करून मॉलमध्ये प्रवेश करावा अस फलक लावण्याची मागणी काँग्रेसचे आसिफ झकेरीया यांनी केली.

स्थायी समिती अध्यक्षांनी झापले

अग्निशमन दलाने वरळीच्या अट्रीया मॉलला स्थायी समिती अध्यक्षांनी माहिती मागवली म्हणून कागदपत्रे व माहिती द्यावी असा उल्लेख करत नोटीस बजावली आहे. यावर सदस्यांनी स्थायी समितीत संताप व्यक्त केला. अग्निशमन दल अधिकारी एखादा फोन आला म्हणून भायखळा अंजीरवाडी येथील इमारत खाली करतात. मग ज्या मॉलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नाही त्या मॉलला टाळे का लावत नाही असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केला.

नियमांचे पालन केले जात नसताना या मॉलची तपासणी करावी असे अग्निशमन दलाला वाटत नाही का? मॉलची पाहणी करतानाच मॉल बंद का करण्यात आले नाहीत, काही घडले असते तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित करत स्थायी समिती अध्यक्षांनी अग्निशमन दलाला झापले.

दोन दिवसात कारवाई

स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला नोटीस देऊन दोन दिवसांत स्पष्टीकरण मागवण्याचे, नंतर आयुक्तांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले. ज्या 29 मॉलना नोटीस देण्यात आली आहे, त्याबाबतची माहिती पुढील बैठकीत स्थायी समितीला सादर करू, असे आश्वासनही वेलारासू यांनी दिले.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबई महापालिकेची भन्नाट आयडिया, फोटोतली बस नाही आहे ‘मोबाईल टॉयलेट’

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय