Konkan Flood | पुरामुळे कोकणात घरेदारे उद्ध्वस्त, केंद्राने तातडीने मदत करावी: संजय राऊत

| Updated on: Jul 23, 2021 | 11:02 AM

कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अनेक घरेदारे उद्ध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे केंद्राने राज्याला तातडीने मदत केली पाहिजे. (sanjay raut)

Konkan Flood | पुरामुळे कोकणात घरेदारे उद्ध्वस्त, केंद्राने तातडीने मदत करावी: संजय राऊत
संजय राऊत
Follow us on

मुंबई: कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अनेक घरेदारे उद्ध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे केंद्राने राज्याला तातडीने मदत केली पाहिजे, असं सांगतानाच संकट पाहता यावेळी केंद्र सरकार राज्याला नक्कीच मदत करेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. (central government should help maharashtra amid flood in konkan: sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. कोकणात हजारो लोक पुरात फसले आहेत. घरदार पाण्यात गेले आहे. रस्ते, नाले, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. अशावेळीच राज्य केंद्राला मदत मागत असतं. यावेळी संकट पाहता केंद्राकडून नक्कीच मदत मिळेल, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही

ऑक्सिजन अभावी एकही व्यक्ती दगावला नसल्याचं उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला जाईल. काही लोक प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने दिलेलं लिखित उत्तर योग्य नाही हे सर्वांना माहीत आहे. मी फक्त महाराष्ट्राबाबत बोलत नाही. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही. हे खरं आहे. पण इतर राज्यात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहेत हे सत्य आहे. पेपरात तशा बातम्या आल्या आहेत. आपण सर्वांनी तो हाहाकार पाहिला आहे. मात्र, तरीही सरकारने लिखित उत्तर दिलं. उत्तर देण्यापूर्वी सरकारने विचार करायला हवा होता, असा टोला राऊत यांनी लगावला.

मुंबई, कोकणात पावसाचं धुमशान

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटले आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाऊस काळ बनून कोसळतोय

परभणीत अनेक गावांचा संपर्क तुटल्याने लोक हवालदिल झाले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रावर पाऊस काळ बनून कोसळत आहे. कोरोनाच्या संकटाशी राज्य व जनता लढत असताना हे ओले संकट उभे ठाकले आहे. कालपर्यंत ज्या नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या त्या आता धोक्याची पातळी ओलांडून गावात, घरांत शिरल्या आहेत. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. (central government should help maharashtra amid flood in konkan: sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

Kolhapur Panchganga river : ड्रोनच्या माध्यमातून पाहा पंचगंगा नदीचं रौद्ररुप

ओढ्याच्या पुरातून जाताना बाईक कलंडली, कोल्हापुरात हवाई दलातील जवान वाहून गेला

Flood Photos : चिपळूण ते चीन, पुराचा हाहा:कार, गाड्याच गाड्या सगळीकडे, हजार वर्षात पहिल्यांदा घडतंय?

(central government should help maharashtra amid flood in konkan: sanjay raut)