बदनामी करू नका, धमकी दिली असेल तर नाव सांगा; चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिजीत दीपकेंना आव्हान
अभिजीत दीपके यांच्या भाजप धमकी आणि ऑफरच्या आरोपांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपके यांना थेट आव्हान दिले आहे. बावनकुळे म्हणाले, "धमकी देणाऱ्यांचे नाव सांगा, अन्यथा बदनामी करू नका." भाजप कार्यकर्त्याकडून चूक झाल्यास कारवाई करू.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके काल छत्रपती संभाजी नगरला आपल्या घरी आले आहेत. तब्बल 40 दिवसानंतर अभिजीत दीपके राहत्या घरी आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी दीपके यांनी आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना भाजपकडून धमक्या आल्या होत्या. भाजपमध्ये सामील होण्याची ऑफरही देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपके यांना थेट आव्हानच केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे मीडियाशी संवाद साधत होते. देशात कोटी सदस्य संख्या आहे. अभिजीत यांना कोणी धमकी दिली आहे, त्याच नाव सांगावं. नाव नसेल तर बदनामी करू नका, असं आव्हान देतानाच आमच्या कार्यकर्त्याने धमकी दिली असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच अभिजीत दीपकेंना आम्ही कोणतीही ऑफर दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
महाराजस्व शिबीराचं आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंती निमित्त राज्यात महाराजस्व शिबिर आयोजित केले आहे. यावेळी फडणवीस यांनी सत्कार, सन्मान स्वीकारले नाहीत. राज्यात विविध योजनांचा लाभ देण्याचा आम्ही विचार केला आहे. 76 हजार परिवारांना योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आम्ही स्वीकारली आहे, असं बावनकुळे म्हणाले.
शिंदेंशी चर्चा करू
भाजप आणि सेनेतील वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रगल्भ नेते आहेत. एकनाथ शिंदे आणि स्थानिक नेत्यांशी यावर चर्चा केली जाणार आहे. स्थानिक आमदार, मंत्री, पालकमंत्री बसून प्रश्न सोडवणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
जरांगेंचे मुद्दे पहावे लागेल
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांचे मुद्दे यावेळी काय आहेत, हे पाहावे लागेल. मागे जे आंदोलन झाले त्यावेळी त्यांचे प्रश्न सरकारने सोडवले होते, असंही त्यांनी सांगितलं.