विधानसभेत धक्काबुक्की, तालिका अध्यक्षांचा माईक ओढला; सत्ताधाऱ्यांची कारवाईची मागणी

| Updated on: Jul 05, 2021 | 2:07 PM

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. (maharashtra assembly monsoon session)

विधानसभेत धक्काबुक्की, तालिका अध्यक्षांचा माईक ओढला; सत्ताधाऱ्यांची कारवाईची मागणी
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ
Follow us on

मुंबई: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भाजपने केला आहे. (Chaos in Maharashtra monsoon session over obc reservation)

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

गोंधळी आमदारांवर कारवाई करा

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. त्यामुळे धक्काबुक्की करणाऱ्या या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे गोंधळी आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे, असं मलिक म्हणाले.

आव्हाड म्हणाले…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला. राज्याच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. लोकशाहीच्या मंदिरात हा लांच्छनास्पद प्रकार घडला असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असं आव्हाड म्हणाले. या आमदारांवर कारवाई करायची की नाही हे वरिष्ठ ठरवतील. पण कारवाईपेक्षा घडलेला प्रकारच निंदणीय आहे, असं ते म्हणाले.

धक्काबुक्की झालीच नाही

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी सभागृहात बाचाबाची झाली नसल्याचं स्पष्ट केलं. अध्यक्षांच्या दालनात आम्ही मुद्दे मांडले. पण आम्हाला बोलू दिलं नाही. भुजबळ सभागृहात चुकीची माहिती देत होते. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा घेतला. पण ऐकून घेतलं नाही. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. सभागृहाचं वातावरण तंग झालं होतं. पण बाचाबाची झाली नाही, असं महाजन यांनी सांगितलं. तर सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा आमदार संजय कुटे यांनी केला आहे. (Chaos in Maharashtra monsoon session over obc reservation)

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासंदर्भातला ठराव राज्य सरकारकडून मंजूर, या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, फडणवीसांचा दावा

उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, ओबीसींसाठी का दिला जात नाही?; भुजबळ-फडणवीसांची विधानसभेत जुंपली

महाविकास आघाडीचे नेते संकटात माझ्यापाठी उभे राहिले नाही, म्हणून ‘ते’ पत्रं लिहिलं; प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान

(Chaos in Maharashtra monsoon session over obc reservation)