आकडे पाहून टीका करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे आकडेचं सांगितले
एकाच दिवसात सहा लाख 97 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा झालेत.
नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाई ही मागील कित्तेक वर्षांपेक्षा जास्त दिलीय. ही नुकसानभरपाई सगळ्यात मोठी आहे. मी, देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी नियम डावलून जास्त मदत दिली आहे. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही आम्ही नुकसानभरपाई दिली आहे. एनडीआरएफच्या नियमानुसार दीड ते दोन कोटी रुपये मदत द्यावी लागली असती. पण, सहा हजार कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात निर्णय आम्ही घेतला आहे. निकष आम्ही बदलले. त्यामुळं त्यांनी आकडे पाहावेत. नंतर टीका करावी.
50 हजार रुपये देण्याचा निर्णय 2019 ला घेतला, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही केली. एकाच दिवसात सहा लाख 97 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा झालेत. हे का बोलत नाहीत. त्यामुळं चांगलं म्हणण्याची वृत्ती आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविली आहे.
शेतकऱ्यांना कुठंही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी थांबविलेल्या सिंचन प्रकल्पाला आम्ही चालना दिली आहे. हजारो कोटी रुपये आम्ही त्याठिकाणी देतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली पाहिजे.
घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा नैतीक अधिकार कुणाला नाही. हे बहुमतातलं सरकार आहे. 170 आमदारांचं आम्हाला पाठबळ आहे. सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय प्रलंबित आहे. हे सरकार लोकशाही पद्धतीनं स्थापन झाले आहे. ज्या सरकारकडं बहुमत असतं ते सरकार कायदेशीर असतं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.