लागलीच घर सोडा… अभिजीत दीपकेचा आईला फोन, कोण करत होते धमकीचा फोन? कुटुंबियांना सगळं उलगडलं…
CJP Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने इतिहास घडवला. पहिल्यांदा मोदी सरकारमधील एखाद्या मंत्र्याची विकेट पडली. धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यापूर्वीचा थरार, भयावह स्थिती आजही आठवली की अभिजीत दिपकेच्या कुटुंबियांच्या काळजाचा थरकाप उडतो. कोणी केला होता धमकीचा फोन?

कॉक्रोच जनता पार्टीने UG-NEET पेपरलीकविरोधात देशात रान पेटवले. या पक्षाचा संस्थापक अभिजीत दिपके हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांवर केलेल्या टिप्पणीनंतर झुरळांचा देशाच्या राजकारणात प्रवेश झाला. CJP आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडवली. 20 जुलैच्या लाठीहल्ल्यानंतर देश या आंदोलनामागे उभा ठाकला. मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांच्या रुपाने मंत्र्याची विकेट पडली. पण 16 मे रोजीपासूनचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. एका मुलाखतीत अभिजीत दिपकेच्या आईने सुरुवातीच्या त्या थरार, भयावह स्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाल्यावर धमक्यांमुळे त्यांचे कुटुंबिय दोन आठवडे लपले होते.
पक्ष स्थापन होताच धमकी सत्र
इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी सुरुवातीच्या दिवसाची आठवण काढली तरी अंगावर काटा येतो असे सांगितले. CJP ची सुरुवात होताच दिपके यांचे कुटुंबिय भूमिगत झाले होते. त्यांना सातत्याने धमक्या मिळत होत्या. पक्ष स्थापन होताच अभिजीत याला बोस्टनमध्ये धमकी मिळाली. त्याला कॉल येऊ लागले. तू जरी बोस्टनमध्ये लपलास तरी तुझ्या कुटुंबियांवर हल्ला करू, अशी धमकी देण्यात आली. धमकी देणारा हा पंजाबमधील असल्याचे नंतर समोर आले. त्याचे छायाचित्रही समोर आले होते. इतरही काही जणांनी धमक्या दिल्या होत्या.
अभिजीतने केला कॉल
या घटनेनंतर अभिजीतने त्यांना कॉल केला. त्यांना तातडीने कुठेतरी जाण्यास सांगितले. तेव्हा दिपके कुटुंबिय कोकणात गेले. तिथे एका नातेवाईकाकडे थांबले. दिपके कुटुंबिय दोन आठवडे लपलेले होते. जेव्हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अभिजित दिपके बोस्टनहून परतला. तेव्हा त्याला घेण्यासाठी कुटुंबिय पोहचले. अभिजीत दिपके हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या गावचा आहे. त्याचे वडील छत्रपती संभाजीनगर शहराजवळील बजाजनगर-वाळूज परिसरात राहतात. त्याचे वडील सेवानिवृत्त अभियंते आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. त्याची बहीण बीड येथे राहते.
अभिजीतने कधीच असा पक्ष स्थापन केल्याची माहिती कुटुंबियांना दिली नव्हती. माध्यमातून त्यांना ही माहिती मिळाली. त्याच्या मुलाखती समोर आल्यानंतर ही बाब समजली. आता अभिजीतच्या लग्न करण्याविषयी कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू आहे. तर अभिजीतनेही जंतर मंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परत बोस्टनला जाण्याचा मनोदय जाहीर केला होता. त्याचवेळी पोलीस अजूनही विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. जर पोलिसांनी अशा कारवायांना प्रतिबंध घातला नाही तर मग शांततापूर्ण मोठे प्रदर्शन करण्याचा इशारा त्याने दिला आहे.