Flood Warning System | पावसाळ्यात मुंबईसाठी वरदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे ई-उद्घाटन

| Updated on: Jun 12, 2020 | 4:51 PM

या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागात गटार, नदी यातील पाण्याची होणारी रिअल टाईम हालचाल, त्याचे प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य होईल. (CM Uddhav Thackeray Virtual Inauguration of Integrated Flood Warning System for Mumbai)

Flood Warning System | पावसाळ्यात मुंबईसाठी वरदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे ई-उद्घाटन
Follow us on

मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबई महापालिकेसह तयार केलेल्या एकात्मिक पूर इशारा यंत्रणा अर्थात ‘इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन झाले. मान्सून काळात ही यंत्रणा मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार, याप्रमाणेच अगदी वादळासारख्या संकटाचीही पूर्वसूचना मिळून सावध होता येईल. (CM Uddhav Thackeray Virtual Inauguration of Integrated Flood Warning System for Mumbai)

या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागात गटार, नदी यातील पाण्याची होणारी रिअल टाईम हालचाल, त्याचे प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य होईल. यामुळे मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचवणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा, भारतीय हवामान विभाग मुंबईचे उपमहासंचालक डॉ. के. एस. घोसालीकर यांच्यासह देशातील विविध विभागीय हवामान वेधशाळेचे प्रमुख यावेळी सहभागी होते.

हेही वाचा : Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम भारतीय हवामान विभागाचे मनापासून अभिनंदन केले. “हवामान विभागाने मान्सून 11 तारखेला येणार असे जाहीर केले होते, त्याप्रमाणे बरोब्बर पावसाने हजेरी दिली. आणखी एका कारणासाठी अभिनंदन करायचे आहे ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळाची सगळी इत्यंभूत माहिती हवामान खाते देत होते. या वादळाची दिशा बदलली तसेच त्याचा वेग मंदावला वगैरे गोष्टी आम्हाला कळत होत्या, त्यामुळे तशी यंत्रणा सज्ज होती. यामुळे जीवितहानी टाळता आली.  कोणतीही आपत्ती आली तर आपण त्यापासून काय शिकतो हे महत्वाचे आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्लड मॅनेजमेंट आणि फ्लड मॅनेजमेंट दोन्ही महत्वाचे

“केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन सध्या देशातील सर्वात बिझी मंत्री असतील.आरोग्य मंत्री म्हणून ते कोरोनाचा मुकाबला करत आहेत. त्यांच्या दृष्टीने आता ब्लड मॅनेजमेंट आणि फ्लड मॅनेजमेंट दोन्ही महत्वाचे आहे. मुंबईसह राज्याने 2005 मध्ये पुरामुळे नुकसान अनुभवले. यात हाय टाईड आल्यावर समुद्रातून उलटे पाणी येऊन मुंबईत पाणी साचते या बाबी लक्षात आल्या. हे टाळण्यासाठी आम्ही पंपिंग स्टेशन्सही बसवले. त्याच काळात पावसाळ्यानंतर लेप्टो, डेंग्यू अशा साथी आल्या. या साथींचे निदान होण्यासाठी 2007 मध्ये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये देशातली पहिली मॉलिक्युलर लॅब आम्ही बनवली. आता कोरोना साथीतही आम्ही शिकलो. त्यामुळेच पूर्वी 2 लॅब होत्या त्या 85 झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. (CM Uddhav Thackeray Virtual Inauguration of Integrated Flood Warning System for Mumbai)


आम्ही मंत्रिमंडळात पर्यावरण विभागाचे नाव बदलून “पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग” असे केले आहे. पर्यावरणाकडे एका वेगळ्या नजरेने आणि गांभीर्यपूर्वक पाहण्यास आमची सुरुवात झाली आहे, असे सांगतानाच, येत्या काळात भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी डॉपलर रडार लवकरात लवकर बसवले पाहिजे, जेणेकरुन हवामानाचा अचूक अंदाज शक्य होईल, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, या यंत्रणेच्या निमित्ताने पुराचा इशारा देणारी देशातील अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत झाली आहे. ही यंत्रणा मुंबईसाठी खूप उपयोगी ठरणार असून ही कार्यान्वित केल्याबद्दल भारतीय हवामान खाते आणि मुंबई महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.

“मुंबईत चार डॉपलर रडार लावण्याची प्रक्रिया सुरु असून पुढच्या मान्सूनच्या आधीच रडार कार्यरत होतील” असे यावेळी घोसालीकर यांनी सांगितले. (CM Uddhav Thackeray Virtual Inauguration of Integrated Flood Warning System for Mumbai)