खत दरवाढीविरोधात काँग्रेसही मैदानात, घंटानाद आंदोलन करू; नाना पटोलेंचा इशारा

| Updated on: May 19, 2021 | 11:47 AM

कोरोनाचं संकट असतानाच केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. (congress leader nana patole demands rollback of fertilizer price hike)

खत दरवाढीविरोधात काँग्रेसही मैदानात, घंटानाद आंदोलन करू; नाना पटोलेंचा इशारा
nana patole
Follow us on

मुंबई: कोरोनाचं संकट असतानाच केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. या दरवाढीविरोधात काँग्रेसनेही दंड थोपाटले आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा पुढच्या आठवड्यापासून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. (congress leader nana patole demands rollback of fertilizer price hike)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. कोरोनाचं संकट असतानाच केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. कोरोनाचे सर्व नियम पाळून घंटानाद आंदोलन करण्यात येईल. हे टाळ्या-थाळ्यांचं आंदोलन नसेल. झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

भाजप दिशाभूल करणारा पक्ष

भाजप हा सातत्याने दिशाभूल करणारा पक्ष आहे. हा पक्ष खोटारडा असल्याचं उघड झालं आहे. भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौड यांना पत्र लिहून खतांच्या दरवाढीवर त्यांचं लक्ष वेधलं आहे. 1200 रुपयाचं खत 1900 रुपयांना मिळणार आहे. ही आर्थिक लूट आहे. यातून भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसल्याचं दिसून आलं आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपने एका वर्षात पेट्रोलचे दर 25 रुपयांनी वाढवल्याची टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रासाठी वेळ नाही

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. त्यांना तिकडे जायला वेळ आहे. पण महाराष्ट्रात येत नाहीत, अशी टीका करतानाच नियम शिथील करून कोकण किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनीही खत आणि रसायन मंत्री सदानंद गौड यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी खतांच्या किमतीत करण्यात आलेली वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे. (congress leader nana patole demands rollback of fertilizer price hike)

 

संबंधित बातम्या:

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्रं

केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं

डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्र

(congress leader nana patole demands rollback of fertilizer price hike)