कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Apr 15, 2020 | 5:24 PM

कोरोनाच्या चाचणीच्या सक्तीमुळे गरोदर महिलांसह डायलेसिस आणि केमोथेरपी घेणाऱ्यांच्या उपचारांना अडथळा होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे (Devendra Fadnavis on compulsion of Corona Test).

कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या चाचणीच्या सक्तीमुळे गरोदर महिलांसह डायलेसिस आणि केमोथेरपी घेणाऱ्यांच्या उपचारांना अडथळा होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे (Devendra Fadnavis on compulsion of Corona Test). त्यांनी याबाबत ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्य सरकारकडे यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गरोदर महिलांसंदर्भात सुद्धा कोरोना चाचण्यांच्या सक्तीमुळे मूळ समस्येवरचा उपचार लांबत आहे. राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, ही माझी विनंती आहे. अनेक रुग्णालये बंद झालेली असल्याने या रुग्णांना कुठे उपचार घ्यावेत, हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणीचे अहवाल यायला विलंब होत असेल आणि त्याअभावी ज्यांना नियमित अत्यावश्यक उपचार मिळत नसतील, तर त्यातून आरोग्याच्या नवीन समस्या उद्भवू शकतात.”

डायलेसिस, केमोथेरपी यासारखे उपचार सातत्याने घ्यावे लागतात. हे उपचार घ्यावे लागणाऱ्यांना कोरोना चाचणी केल्याशिवाय उपचार मिळेनासे झालेत. खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी सक्तीची करायला हरकत नाही. पण, त्या चाचणीचे अहवाल लगेच मिळण्यासाठी रॅपीड टेस्टची परवानगी द्यायला हवी, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वांद्र्याच्या घटेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रा येथील घटनेनंतर राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य द्या,असे सांगतो आहे. पंतप्रधान सुद्धा वारंवार सांगताहेत की, रेल्वे सुरु केल्या तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणार नाही. त्यामुळे आपले कोरोनाविरूद्धचे युद्ध कमकुवत होईल. सध्या जे जेथे आहेत, तेथेच त्यांची व्यवस्था करणे, याला सर्वोच्च प्राधान्य हवे. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करुन पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे.”

बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असंही त्यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या :

केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही कोरोना लढ्यासाठी पैसे मिळेनात : बाळासाहेब थोरात

राजकारणात राजकीय संघर्ष नेहमीचा, कोरोनाचा पराभव हे आपले उद्दिष्ट : शरद पवार

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, ‘जी दक्षिण’मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड

Devendra Fadnavis on compulsion of Corona Test