मुंबई : आपल्या मागण्या सरकारदरबारी मांडण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन (Students Protest) करणे हा भारतीय राज्य घटनेने दिलेला अधिकार आणि आयुध आहे. एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोटीसा देऊन, कार्यवाहीची आणि ब्लॅकलिस्ट करण्याची भीती दाखवून आंदोलन करण्यापासून रोखणे हे घटनाविरोधी असून, राज्य लोकसेवा आयोगाने उलट आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये (MPSC Mains) चंद्रकांत दळवी समितीने केलेल्या शिफारशीनुसार जे बदल केले त्यावरून मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना त्यांना पोलिसांकरवी नोटीस देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. यावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.