Special Report : देवेंद्र फडणवीस यांना अटक करायची होती का?; फडणवीस म्हणतात, “यांना सुपारी देण्यात आली होती”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिलीप वळसे पाटील यांच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही. मला अटक करण्याचा आदेश हा वळसे पाटील यांचा नव्हता. तो वरून आलेला आदेश होता.
मुंबई : मला अटक करण्यासाठी डाव रचण्यात आला होता. माझ्या अटकेची सुपारी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) संजय पांडे यांना दिली होती. असा सणसणाटी आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. मला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा डाव होता. असा खळबळजनक गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. विशेष म्हणजे याची माहिती आताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळी मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही होती, असंही फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते. अटकेचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं. असा दावा फडणवीस यांनी केला. त्यासंदर्भात अनेक प्रयत्न संजय पांडे आणि काही लोकांनी केले होते. परंतु, ते यशस्वी झाले नाहीत.
वळसे पाटील यांनी आरोप फेटाळले
या आरोपानंतर दिलीप वळसे पाटील माध्यमांसमोर आले. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची कोणतीही रणनीती नव्हती. असं वळसे पाटील म्हणाले. वळसे पाटील यांचा त्यात हात नसून, त्यांना वरून आदेश होते. असं फडणवीस यांचं म्हणणं आहे.
कुठलाही प्रयत्न किंवा अशा प्रकारची योजना महाविकास आघाडीच्या सरकारची नव्हती. त्यामुळं ही गोष्ट खरी नाही. त्यांनी त्यांच्या माहितीच्या आधारावर बोलले असतील. पण, मला जी माहिती आहे. त्यानुसार राज्य सरकारनं असं काही केलं नाही, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
मला अटक करण्याचा आदेश वरून होता
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिलीप वळसे पाटील यांच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही. मला अटक करण्याचा आदेश हा वळसे पाटील यांचा नव्हता. तो वरून आलेला आदेश होता.
अनिल देशमुख, नवाब मलिक या दोन नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. विधानसभेत पेन ड्राईव्ह बाँब टाकून फडणवीस यांनी सरकारला घेरलं होतं. त्यामुळं आपल्याला अडकविण्यासाठी डाव रचला गेला होता, असा दावा फडणवीस यांनी केला.