निवडणूक येताच म्हणतात मुंबई खतरे में है… एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथील सभेत चांगले तोंडसुख घेतले.

निवडणूक येताच म्हणतात मुंबई खतरे में है... एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
eknath shinde
| Updated on: Jan 12, 2026 | 11:38 PM

महायुतीने शिवतीर्थ येथे सोमवारी रात्री मोठी सभा घेतली. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका करताना हे भाऊ स्वत:चे अस्तित्व संपण्याच्या भीतीने एकत्र आल्याचे सांगितले. आमची कोणाला उत्तर देण्यासाठी ही सभा घेतलेली नाही. आम्ही विकासाचे राजकारण करणारे आहोत असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पुढे म्हणाले की, शिवतिर्थाचं आणि शिवसेनेचं अतुट नातं आहे. महायुतीचं अतुट नातं आहे. समोरच बाळासाहेबांचं स्मृती स्थळ आहे. मागे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्या बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे. बाजूला सावरकर स्मारक आहे. या तिन्ही महापुरुषांच्या साक्षीने सभा होत आहे. शिवतिर्थावरची ही प्रचार सभा नाही तर परिवर्तन आणि बदलाची नांदी आहे असेही शिंदे यावेली म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की काल इथे एक सभा झाली. त्यात नेहमीच्याच शिव्याशाप, टोमणे टीका करून गेले. आता आम्हाला सवय झाली. तुम्हालाही झाली आहे. त्यांच्याकडे मुद्देच नाही. आपली सभा कुणालाही उत्तर देण्यासाठी नाही. तर साडेतीन वर्षात महायुतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि पुढच्या पाच वर्षात आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी ही सबआ आहे. या आरोपांना मी कधी आरोपाने उत्तर दिलं. मी आरोपांना कामातून उत्तर दिलं आणि कामातूनच उत्तर देतो. आता भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण लोकांना अपेक्षित आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

… निवडणुका आल्यावर पॉलिटिक्स

आम्ही तेच केलं. तेच करणार. भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण. विकसित भारत हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करत आहोत. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानीसारखीच दिसली पाहिजे हे आम्ही ठरवलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि मोदींचं व्हिजन घेऊन आपण पुढे चाललो आहोत असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही मुंबईच्या विकासासाठी काम करत आहोत. यापुढेही फक्त विकास विकास आणि विकास हाच अजेंडा आहे. काही लोकांना निवडणूक आल्यावर मराठी माणसाची आठवण येते. एरव्ही ढुंकूनही पाहत नाही. त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटत नाही. दिवसभर नेटफिलिक्स आणि निवडणुका आल्यावर पॉलिटिक्स सुरू आहे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

 

Follow Us