भाजपवरच भिस्त, ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करणारा शेतकरी फडणवीसांच्या भेटीला

| Updated on: Jan 22, 2020 | 8:31 AM

भाजप कार्यालयात शेतकरी महेंद्र देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

भाजपवरच भिस्त, मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा शेतकरी फडणवीसांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर आले असताना धक्काबुक्की झालेले शेतकरी महेंद्र देशमुख यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो, अशा भावना महेंद्र देशमुख यांनी भेटीत व्यक्त (Mahendra Deshmukh meets Devendra Fadnavis) केल्याची माहिती आहे.

महेंद्र देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले असताना ‘मातोश्री’बाहेर त्यांच्यावर अन्याय झाला होता. हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

कृषीमंत्री, तहसीलदार, बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करुनही हा विषय मार्गी न लागल्याने शेवटी महेंद्र देशमुख आपल्या लहान मुलीसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. भाजप कार्यालयात देशमुखांनी फडणवीसांची भेट घेतली.

या भेटीमुळे आपलं समाधान झाल्याचं शेतकरी महेंद्र देशमुख यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेतेच मला न्याय देऊ शकतील. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना फक्त भाजप न्याय देऊ शकतं, असं देशमुखांनी सांगितल्याचं भाजप आमदार राम कदम म्हणाले.

कोण आहेत महेंद्र देशमुख?

पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी 6 जानेवारीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कृषिमंत्री म्हणाले होते.

मातोश्रीवरील आंदोलनापासून चर्चेत असलेले महेंद्र देशमुख पनवेल तहसीलदार कार्यालयात पत्नी आणि तीन मुलींसह उपोषणाला आले होते. मात्र या चौघांना पोलिसांनी बसू दिलं नव्हतं. पनवेल तहसीलदार अमित सानप यांनी कर्ज न घेता शेतकऱ्यावर खोटं कर्ज दाखवलं. तसेच त्याच्या फिक्स डिपॉझिटची रक्कम त्याला परत मिळू नये यासाठी हे षड्यंत्र रचल्याचा आरोप शेतकरी महेंद्र देशमुख यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी, तसेच स्वखर्चासाठी 23 फेब्रुवारी 2006 रोजी 8 लाख 40 हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.

2008 मध्ये बँकेने देशमुख यांना दूध डेअरीच्या व्यवसायासाठी 40 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. त्यावेळी त्या 40 लाखांसाठी देशमुख यांची 40 लाख रुपये किंमतीएवढी मालमत्ता बँकेला तारण म्हणून हवी होती.

15 मार्च 2008 रोजी महेंद्र देशमुख यांनी 10 लाख 20 हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी 2006 आणि 2007 या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे 23 ते 24 लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास 8 लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे 32 लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही 40 लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी 8 लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले.

या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास 32 लाख रुपये परत मिळू नयेत, यासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर महेंद्र देशमुख न्याय मागण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र देशमुख आणि त्यांच्या लहान मुलीला खेरवाडी पोलीस ठाण्यात सहा तास बसवले होते. यानंतर दोघांना कुर्ला रेल्वे पोलिसांकडून पनवेलकडे पाठवले होते.

Mahendra Deshmukh meets Devendra Fadnavis