दसऱ्याचा मुहूर्त साधून गडसंवर्धनाचे काम, ‘बाण हायकर्स’ची गायमुख किल्ला साफसफाई मोहीम!

| Updated on: Oct 25, 2020 | 4:59 PM

या मोहिमेमध्ये किल्ल्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्यांचा कचरा गोळा करण्यात आला.

दसऱ्याचा मुहूर्त साधून गडसंवर्धनाचे काम, ‘बाण हायकर्स’ची गायमुख किल्ला साफसफाई मोहीम!
Follow us on

ठाणे : सणांच्या निमित्ताने अनेक लोक काहीना काही संकल्प घेत असतात. त्यातही साडेतीन मुहूर्तांपैकी एका असणाऱ्या ‘दसरा’ सणाला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी काहीतरी चांगले कार्य घडावे असा संकल्प घेत, ठाणे शहरापासून जवळ असलेल्या गायमुख किल्ल्यामध्ये (Gaimukh Fort) बाण हायकर्सच्या (Baan Hikers) कार्यकर्त्यांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) स्वयंस्फूर्तीने सफाई मोहिम राबवली होती. (Gaimukh fort cleanup campaign by baan Hikers on the occasion of dussehra)

गड संवर्धनाच्या या मोहिमेमध्ये किल्ल्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्यांचा कचरा गोळा करण्यात आला. आता यानंतर या किल्ल्यामध्ये सफाई ठेवत, या किल्ल्याचे अस्तित्व अबाधित राखावे, यासाठी संबंधित प्रशासनाला लवकरच एका निवेदनाद्वारे विनंती केली जाणार आहे.

एक ऐतिहासिक शहर म्हणून ठाणे ओळखले जाते. मात्र आजही अशा अनेक जागा आहे ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. अशी काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्याबद्दलच्या नोंदी नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. असेच गायमुख किल्ल्याविषयी झाले असल्याने त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. गायमुख खाडी शेजारी आणि नव्याने उभारलेल्या गायमुख चौपटीच्या शेजारीच गायमुख किल्ला (Gaimukh Fort) शेवटच्या घटका मोजत आहेत. हा किल्ला हळूहळू ढासळत चालला असून त्याला अक्षरशः कचरा कुंडीचे रूप आले आहे. त्यामुळेच या किल्ल्याची सफाई करण्याची मोहिम दसऱ्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी बाण हायकरचे कार्यकर्ते दिवाकर साटम, अभिजित तावडे, विश्राम मरगज, संतोष देवळकर, जयप्रकाश शेवडे यांनी पार पाडली. (Gaimukh fort cleanup campaign by baan Hikers on the occasion of dussehra)

ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न

ठाण्याला लाभलेला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे, या भावनेतून हे काम हाती घेण्यात आले होते. गड संवर्धनासाठी टीमने केलेला हा छोटासा प्रयत्न होता. पुढील काळात या ठिकाणी माहिती फलक लावण्याचे कामही करण्यात येणार आहे. शिवाय या ऐतिहासिक जागेचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी आखण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘बाण’ कडून करण्यात आले आहे. ‘बाण हायकर्स’ या टीमकडून अशा अनेक मोहिमा राबवण्यात येत असतात. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक जागांचे संवर्धन आणि साफसफाई अशा मोहिमांमध्ये ‘बाण हायकर्स’ अग्रेसर आहेत.

(Gaimukh fort cleanup campaign by baan Hikers on the occasion of dussehra)