तब्बल 5 हजार जण हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये, मुंबईत 4 हजार जणांचं पथक कार्यरत : राजेश टोपे

| Updated on: Apr 01, 2020 | 4:58 PM

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात (High Risk contact) जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त नागरिक आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तब्बल 5 हजार जण हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये, मुंबईत 4 हजार जणांचं पथक कार्यरत : राजेश टोपे
Follow us on

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात (High Risk contact) जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त नागरिक आले आहेत. एमओएच टीमच्या माध्यमातून या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांची यादी आली आहे. या यादीत 5,343 जणांची (High Risk contact) नावे आहेत. या सर्वांवर अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवलं जात आहे. त्यासाठी 4 हजार जणांचं पथक संपूर्ण मुंबईत कार्यरत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रासारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

“मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा 162 वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये साहजिकच चिंतेचं वातावरण असणार आहे. मात्र, आम्ही खात्रीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक सांगतो, हा आकडा अनुमानितच आहे. तो एका ठरावीक स्तरापर्यंत जाऊन स्थिर होईल. हा आकडा जास्त वाढणार नाही. महापालिका अधिकारी, सर्व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर सर्वांकडून अतिशय काळजी घेतली जात आहे”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपेंकडून डॉक्टर-कर्मचारींचे पत्राद्वारे आभार

‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची सेवा करणारे राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘कोरोना’शी लढणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी ‘युद्धातील आघाडीवरचे सैनिक’ अशी उपमा दिली. जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखवताना न थकता हे काम सुरु ठेवल्याबद्दल राजेश टोपेंनी सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.

‘कोरोनाचे जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहात. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील 39 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार!’ असं आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून आरोग्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

भाईंदरचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ‘कोव्हीड19 हॉस्पिटल’ घोषित

कोरोना मोहिमेसाठी अंगणवाडी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मानधन, 25 लाखांचा विमा : हसन मुश्रीफ