लोकल ठप्प, बसेस नाहीत, वाहतुकीची कोंडी अन् पावसाची रिपरिप; चाकरमानी म्हणतात, जाये तो जाये कहाँ!

| Updated on: Jun 09, 2021 | 7:01 PM

आज येईल, उद्या येईल म्हणून वाट पाह्याला लावणाऱ्या पावसाने अखेर दमदार हजेरी लावली. दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला. पण पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडवून दिली.

लोकल ठप्प, बसेस नाहीत, वाहतुकीची कोंडी अन् पावसाची रिपरिप; चाकरमानी म्हणतात, जाये तो जाये कहाँ!
mumbai rain
Follow us on

मुंबई: दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. दिवसभर धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेरुळावर पाणी आल्याने लोकल ठप्प झाली. त्यातूनही मार्ग काढत कामावर पोहोचलेल्या चाकरमान्यांना घरी कसे पोहोचावे हाच प्रश्न पडला आहे. अजूनही लोकल पूर्णपणे सुरू झाल्या नाहीत. वाहतुकीची कोंडी कमी झाली नाही, बसेस मिळत नाहीत अन् पावसाची रिपरिप थांबत नाही. त्यामुळे जाये तो जाये कहाँ, असं म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. (Heavy rain traps mumbaikar at dadar, csmt, kurla, wadala, andheri)

आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा लागल्याने अनेकांना कारमध्येच तिष्ठत बसावे लागले. वरून कोसळणारा धोधो पाऊस आणि वाहतूककोंडीत तिष्ठत बसावे लागत असल्याने चाकरमानी संतापले होते. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, लोकल अद्यापही पूर्णपणे सुरू न झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.

फोर्ट, दादर परिसरात चाकरमानी खोळंबले

संध्याकाळी कामावरून सुटलेल्या चाकरमान्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. दादर, फोर्ट परिसरात कामावर आलेल्या चाकरमान्यांना एसटी आणि बसेस मिळत नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. ज्यांना एसटी आणि बसेस मिळाल्या ते वाहतूककोंडीत अडकून पडले आहेत. तर, लोकलही पूर्णपणे सुरू न झाल्याने चाकरमान्यांचा संतापाचा पारा अधिकच चढला आहे.

वडाळ्यात प्रचंड वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या सखल भागात प्रचंड पाणी साचलेले आहे. त्यामुळे घरी जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. वडाळा चार रस्ता आणि वडाळा ब्रिज परिसरात गेल्या तीन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे घरी कधी पोहोचायचं? असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. वडाळा लूप रोडवर बसेस पाण्यात अडकल्या आहेत. रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत. वडाळा रेल्वे ट्रॅकवरही पाणी आलं आहे, त्यामुळे चाकरमानी चांगलेच वैतागले आहे.

सायन पुलाखाली कमरेपर्यंत पाणी

सायन परिसरात पुलाखाली कमरेपर्यंत पाणी भरलं आहे. त्यामुळे या पाण्यात अनेक दुचाकी बंद पडल्या आहेत. तसेच रिक्षांमध्येही पाणी घुसल्याने रिक्षा चालकांची वाट लागली आहे. सायन पुलाखाली पाणीच पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. अजूनही या भागातील पाण्याचा निचरा न झाल्याने लोक चांगलेच वैतागले आहेत.

ट्रक पलटी, दुष्काळात तेरावा महिना

आज दुपारी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रक पलटी झाला. आधीच वाहतूककोंडी असताना त्यात ट्रक पलटी झाल्याने अधिकच वाहतूककोंडी झाली. पावसामुळे समोरचा अंदाज न आल्याने ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक पलटी झाल्याचं सांगण्यात आलं.

कंटेनर उलटला

भिवंडीलाही आज सकाळपासून पावसाने झोडपून काढले. त्यामुळे भिवंडीकरांचीही तारांबळ उडाली. पावसामुळे बऱ्याच भागात पाणी भरल्याने भिवंडीत अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचं चित्रं दिसत होतं. तर शेलार नदीनाका येथे कंटेनर उलटल्याने या ठिकाणी बराच वेळ वाहतूककोंडी होती. (Heavy rain traps mumbaikar at dadar, csmt, kurla, wadala, andheri)

 

संबंधित बातम्या:

पहिल्याच पावसाने मुंबई पाठोपाठ ठाण्यालाही छळलं, लोकल सेवा ठप्प, इमारतीच्या संरक्षण भिंत कोसळल्या, जनजीवन विस्कळीत

Mumbai Rains Live: पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा 12 तासांत फोल, मुंबई तुंबल्याने विरोधक बरसले

(Heavy rain traps mumbaikar at dadar, csmt, kurla, wadala, andheri)