मुंबईत उन्हाचा ताप वाढला, पंखे, कुलर आणि एसीचा वापर वाढल्याने वीजेच्या मागणीत वाढ

मुंबईतील तापमानात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सांताक्रुझ वेध शाळेतील नोंदणीनुसार मुंबईचे तापमान 38.7 अंश नोंदले गेले आहे. त्यामुळे वीजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत उन्हाचा ताप वाढला, पंखे, कुलर आणि एसीचा वापर वाढल्याने वीजेच्या मागणीत वाढ
temperature increases in mumbai
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Mar 21, 2024 | 10:16 PM

मुंबईत गेले काही दिवस उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच ही अवस्था तर पुढे एप्रिल आणि मे महिन्यात होणार काय ? याविषयी चिंता लागून राहीली आहे. यंदाचा उन्हाळा जास्त कडक असणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मार्च महिन्यातच राज्यातील अनेक नदी आणि धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पाणी टंचाई सुरु झाली आहे. मुंबईतील तापमान प्रचंड वाढल्याने घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. मुंबईचा पारा 38.7 सेल्सिअस अंशावर पोहचले आहे. सांताक्रुझ वेधशाळेने बुधवारी 38.7 अंश तापमान नोंदविल्याने या वर्षातील आतापर्यंत हे सर्वात जास्त तापमान आहे. तापमानात वाढ झाल्याने वीज वापर वाढला असल्याने वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

मुंबईतील सांताक्रुझ वेधशाळेने बुधवारी दिवसाचे तापमान 38.7 अंश नोंदले आहे. या वर्षातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान नोंद झाले आहे. गेल्या वर्षी सांताक्रूझ वेधशाळेने 13 मार्च रोजी दिवसाचे कमाल तापमान 39.4 अंश नोंदवले होते. तर बुधवारी कुलाबा वेधशाळेने दिवसाचे तापमान 34.3 अंश नोंदवले असून ते सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे. मुंबईत 28 मार्च 1956 रोजी मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान 41.7 अंश इतके नोंद झाले होते. तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उष्णतेच्या लाटांची झळ सहन करावी लागत आहे. मुंबईकरांना टळटळीत उन्हात बाहेर पडू नये. विषेशत: आजारी तसेच ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांनी उन्हात जास्त फिरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

तापमान वाढल्याने वीजेच्या मागणीत वाढ

एकीकडे मुंबईतील तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे वीजेची मागणी वाढत चालली आहे. मुंबईतील वीजेच्या मागणीत गेल्याकाही दिवसात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईतील वीजेची कमाल मागणी 3 हजार मेगावॅटच्यावर गेली आहे. तर बुधवारी राज्यभरात वीजेची सर्वाधिक मागणी 27 हजार मेगावॅटच्या जवळपास होती. मुंबई आणि उर्वरित राज्यभरातील सुमारे 3.5 कोटी ग्राहकांना पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी वीज खरेदी करार करण्यात येणार आहेत. ज्यात मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे 50 लाख वीज वापरकर्त्यांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेमुळे मुंबईतील सर्वाधिक मागणी 3 हजार 300 मेगावॅटवरून या उन्हाळ्यात 4 हजार मेगावॅटच्यावर वीजेची मागणी जाऊ शकते. गेल्यावर्षी मुंबई आणि उर्वरित राज्याची मिळून 30 हजार मेगावॅटपेक्षा जास्त विजेची एकत्रित कमाल मागणी होती. ही वीजेची मागणी बेस्ट, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि महावितरणने पूर्ण केली होती.

Follow Us