INDIA alliance meet : वडापाव, झुणका भाकर, पुरणपोळी आणि… इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी खास मेन्यू; मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल

इंडिया आघाडीची आज आणि उद्या बैठक होत आहे. या बैठकीला 28 पक्षांचे नेते मुंबईत येत आहेत. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांकरता मराठमोळ्या पदार्थांचा खास बेत ठेवण्यात आला आहे. शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थही ठेवण्यात आले आहेत.

INDIA alliance meet : वडापाव, झुणका भाकर, पुरणपोळी आणि... इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी खास मेन्यू; मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल
india alliance
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 31, 2023 | 11:02 AM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : मुंबईत आजपासून इंडिया आघाडीची बैठक सुरू होत आहे. आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होईल. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी एकूण 28 पक्षांचे नेते येणार आहेत. विविध राज्यातील हे नेते आहेत. मात्र, असं असलं तरी या नेत्यांना खास मराठमोळ्या पदार्थांचा अस्वाद चाखायला मिळणार आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी मराठमोळे खाद्यपदार्थच ठेवण्यात आले आहेत. वडापाव आणि झुणका भाकरपासून ते पुरणपोळी पर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थांवर पाहुण्यांना ताव मारता येणार आहे.

आज संध्याकाळी ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. देशभरातील महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचं आयोजन केलं आहे. या नेत्यांसाठी नाश्त्याला बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव ठेवण्यात आला आहे. तसेच सोबत चहा आणि कॉफींसह नारळपाणी, लिंबूपाणई तसेच फळांचा रसही ठेवण्यात आला आहे.

झुणका आणि मोदक

तसेच पाहुण्यांसाठी स्वीट डिशमध्ये नारळाची करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पाहुण्यांना गरमागरम पुरणपोळीचा अस्वादही चाखता येणार आहेत. या पाहुण्यांसाठी झुणका भाकरही ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्यासहीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेलही यावेळी असणार आहे.

असा आहे कार्यक्रम

ग्रँड हयात हॉटेलमध्ये 100 हून अधिक रुम बुक करणअयात आले आहेत. हॉटेलच्या आसपासच्या हॉटेलमधील रुमही बुक करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असली तरी उद्धव ठाकरे हेच या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व करत आहेत.

तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे.

आज संध्याकाळी सर्व नेत्यांची औपचारिक बैठक होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीने ही बैठक व्यवस्थित पार पडावी म्हणून 18 लोकांची एक टीम तयार केली आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांच्या 6-6 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

उद्या 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर लंचनंतर दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

मनसेची टीका

दरम्यान, इंडिया आघाडीच्या जेवणावळीवर मनसेने टीका केली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. राज्यात 3 आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.