
Jayant Patil On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चाच झडत आहेत. पण त्याविषयीचे कोणतेही पाऊल अजून उलण्यात आलेले नाही. या सोमवारी आणि मंगळवारी काहीतरी ठोस असं बाहेर येण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या लेखावर आक्षेप नोंदवला. तर विलिनीकरणावरही मोठे भाष्य केले. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यातून जयंत पाटील भावनिक झाल्याचे दिसले. त्याचवेळी त्यांनी नाव न घेता तटकरेंनाही उत्तर दिले आहे.
काय म्हणाले तटकरे?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे देण्यात येणार होते. याबाबत शरद पवारांसह इतर नेत्यांमध्ये याविषयी एकमत झालं होतं. असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या मासिकात त्यांनी याविषयीचा मुद्दा मांडला. त्याचवेळी काही अदृश्य शक्तींचा हात असल्याने राष्ट्रवादीत फुट पडली आणि अजितदादांनी वेगळी चूल मांडल्याचे त्यांनी या लेखातून मत मांडलं होतं. त्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला. तटकरेंनी शिंदेंना फटकारलं. शिंदेंचा लेख हा गैरलागू असल्याचा दावा केला. तर योग्यवेळी त्यावर उत्तर देणार असल्याचे म्हटले.
तर विलिनीकरणाबाबतही तटकरेंनी भूमिका स्पष्ट केली. या संदर्भातील निर्णय जेव्हा प्रस्ताव मांडला जाईल, तेव्हा त्यावर चर्चा होईल. विलिनीकरणावर सुनेत्रा पवार आणि पक्षाचे नेते चर्चा करतील असे तटकरे यांनी सांगितले. अगोदर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत निर्णय होईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी सुनावले
तर या सर्व घडामोडींवर जयंत पाटील यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. विलिनीकरणासाठी अजितदादा आग्रही होते. तसेच याविषयी बैठकाही झाल्या. अजितदादा 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी ताज्या घडामोडीं आधारे पुन्हा या मुद्दावर वक्तव्य केले.
ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.अजितदादा हे विलिनीकरणासाठी आग्रही होते. निकटच्या सात-आठ महिन्यात माझ्या निवासस्थानी दादा आले होते. प्रसार माध्यमात वेगवेगळे नेते बोलत आहे. आमचा पक्ष व्यवस्थित सुरू आहे. तो काही बंद पडलेला नाही. विलिनीकरण कुणाला नकोय त्याचा निष्कर्ष जनतेने काढावा असे जयंत पाटील म्हणाले. इतरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही असे त्यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता सुनावले.