
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह सर्वत्र सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या २९ महानगरपालिकांमध्ये सर्व नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळच्या सत्रात अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि उत्साही तरुण मतदारांनी पहिले मतदान, मग इतर काम असा पवित्रा घेत सकाळीच मतदान केंद्रांवर हजेरी लावली. आता सकाळी ७:३० ते ९:३० या पहिल्या दोन तासात राज्यात कुठे किती मतदान झाले, याची आकडेवारी समोर आली आहे. यातील काही शहरांत मतदानाचा वेग समाधानकारक आहे, तर काही ठिकाणी संथ सुरुवात झाली आहे.
मालेगावात सकाळी ९:३० वाजेपर्यंत सर्वाधिक ११.०९ टक्के मतदान झाले आहे, जे राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत लक्षणीय आहे. तर मुंबईत सकाळच्या दोन तासांत ६.९८ टक्के मतदान झाले. अनेक दिग्गज सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच अहिल्यानगरातथ सकाळी ९:३० पर्यंत एकूण २४,१७५ मतदारांनी मतदान केले. ज्यात १२,६०८ पुरुष आणि ११,५६७ महिलांचा समावेश आहे.
| महानगरपालिका | मतदानाची टक्केवारी |
| मालेगाव | 11.09 % |
| अहिल्यानगर | 8.14 % |
| ठाणे | 8.00 % |
| नागपूर | 7.00 % |
| मुंबई (BMC) | 6.98 % |
| सोलापूर | 6.86 % |
| पिंपरी चिंचवड | 6.56 % |
| नाशिक | 6.51 % |
| सांगली | 6.45 % |
दरम्यान राज्यातील या निवडणूक निकालांचा कल ठरवण्यात सकाळच्या सत्रातील हे मतदान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाकडून वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम (EVM) मशिनमध्ये किरकोळ बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवली.
मतदानाची ही प्रक्रिया संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत चालणार असून, वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात गर्दी कमी होण्याची शक्यता असली, तरी संध्याकाळी पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वच राजकीय पक्षांकडून आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.