Mumbai Goa Highway closed : धुव्वाधार पावसाने कोकण बेहाल! मुंबई-गोवा महामार्ग बंद, अंजनारी पुलाजवळ वाहतूक रोखली
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याजवळ अंजनारी पुलाजवळ पाणी वाढलंय.
रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने (Maharashtra Rain News) जोर धरलाय. त्याचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसलाय. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प (Mumbai Goa Highway Closed) झाली असून रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला आहे. अंजनारी पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी आणि गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील (Konkan Rain Update) जनजीवन प्रभावित झालं आहे. सकाळपासूनच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या घाटमार्गातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. नद्याही दुथडी भरुन वाहत असून आता मुंबई-गोवा महामार्गही ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. अंजनारी मुलावरही वाहतूक बंद केल्यानं आता मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. तसंत दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्यासही सुरुवात झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक अंजनारी पुलाजवळ दोन्ही बाजूने थांबवण्यात आल्याची माहिती मिळतेय.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याजवळ अंजनारी पुलाजवळ पाणी वाढलंय. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना आणि घरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सकाळई 11 वाजून 10 मिनिटांची अजंनारी पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली.
तळकोकण धुव्वाधार पाऊस
तळकोकणातील सर्वच तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग तालुक्यातही पावसाची बॅटिंग सुरु असून वातावरणातही कमालीचा गारवा पाहायला मिळालाय. तर रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळल्यानं गेल्या 12 पेक्षा अधिक तासांपासून वाहतूक ठप्प होती. गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली होती. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका करूळ घाटाला बसलाय.
करुळ घाटातील संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे घाटमार्ग बंद झालाय. परिणामी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांना जोडणाऱ्या प्रमुख घाटापैकी एक असलेल्या करुण घाटातली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीय. करुळ घाटामध्ये रात्री दहाच्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला होता.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.फोंडाघाट व आंबोली मार्गे या मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली.
वाचा महाराष्ट्रातील पावसाची बित्तबातमी : राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट