मनोज जरांगे यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती? भाजपच्या बड्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावर भाजपने थेट हल्ला चढवला आहे. जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती आहे का? या प्रश्नावर मंत्री आशिष शेलार यांनी थेट उत्तर दिलं आहे. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका न करता केवळ विद्यमान सरकारला लक्ष्य करण्यामागे राजकारण असल्याचा संशय शेलार यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती? भाजपच्या बड्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
Manoj Jarange Patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 1:39 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. जरांगे मुंबईला कूच करण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्यासोबत हजारो समर्थकांचा ताफा आहे. ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबईला येत असल्याने मुंबईतील सुव्यवस्था ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती असल्याचं सांगितलं जात आहे. तशी राज्यभरात चर्चा सुरू आहे. या चर्चेवर राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनात राजकारणाचा वास येत असल्याचं थेट विधान शेलार यांनी केलं आहे. भाजपने पहिल्यांदाच जरांगे विरोधात थेट आणि आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यावर आता जरांगे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा समाजासाठी एसीबीसीचं आरक्षण देण्यापासून ते विविध निर्णय आमच्या सरकारने घेतले आहेत. मराठा समाजासाठी ओबीसींच्या धरतीवर सर्वाधिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतले आहेत. आधीच्या कोणत्याच मंत्र्यांनी निर्णय घेतले नाही. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकण्यासाठी काहीच केलं नाही. फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारने हे आरक्षण टिकवलं. ओबीसी समाजासारखे न्यायिक निर्णय घेतले. मंत्रिमंडळ गट त्यावर काम करत आहे. एवढं करूनही जरांगे आमच्यावर टीका करतात. त्यांच्यावर काहीच बोलत नाहीत हे आश्चर्य आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

जरांगेंनाच बोलावं लागेल

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय लोक आहेत का? असा सवाल करताच शेलार यांनी थेट उत्तर दिलं. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजासाठी काही केलं की नाही यावर जरांगे बोलत नाहीत. फडणवीस आणि शिंदेंनी मराठा समाजासाठी बरंच काही करूनही त्यावर बोललं जात आहे. त्यामुळे लोकांना जरांगेंच्या भूमिकेवर संशय येतोय. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं? यावर जरांगे कधी बोलले का? आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही, तरीही त्यांच्याबद्दल जरांगे काहीच बोलत नाही आणि आमच्यावरच बोललं जात आहे. एकेरी भाषेत टीका केली जात आहे. त्यामुळेच इथे राजकारणाचा वास येतो, असं शेलार म्हणाले. जरांगे यांच्या मागे कोणी राजकारणी आहे की नाही माहीत नाही. पण लोकांमध्ये तशी चर्चा आहे. आता जरांगे यांनाच त्यावर बोलावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आधी शिंदेंनी उत्तर द्यावं

जरांगे यांचं आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी झाल्याची टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली होती. शिंदे यांच्या या टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शशिकांत शिंदे यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते. शरद पवारही मुख्यमंत्री होते. या सर्वांनी मराठा समाजासाठी काय केलं? याचं उत्तर आधी शशिकांत शिंदे यांनी द्यावं. त्यानंतर यश अपयशावर बोलू, असा टोला शेलार यांनी लगावला.

तो त्यांचा अधिकार

आंदोलनासाठी अर्ज करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोर्टात जायचं तर जाऊ शकतात. परवानगी देणं न देणं हे पोलिसांचं काम आहे. त्यावर मी बोलणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us