मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, शिवसेनेकडून छ. संभाजीनगरमधून लढणार?
"मी सांगितलं होतं लोकसभा लढवायची आहे. मला चांगला प्रतिसाद होता. माझा वाढदिवस होता म्हणून वडिलाधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणून भेट घेतली. त्यांनी मला स्पेशल वेळ दिला. अपेक्षित चर्चा झाली. मला विश्वास आहे इलेक्टीव मेरिटवर एकनाथ शिंदे मला उमेदवारी देतील", अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.
![मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, शिवसेनेकडून छ. संभाजीनगरमधून लढणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, शिवसेनेकडून छ. संभाजीनगरमधून लढणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/vinod-patil-and-eknath-shinde.jpg?w=1280)
मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तथा मराठा समन्वयक विनोद पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या जागेवर शिवसेना किंवा भाजप उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार घोषित करण्यात आला आहे. तसेच विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत. तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. असं असताना महायुतीचा संभाजीनगरचा उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. असं असताना आता मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विनोद पाटील हे संभाजीनगरमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“मी सांगितलं होतं लोकसभा लढवायची आहे. मला चांगला प्रतिसाद होता. माझा वाढदिवस होता म्हणून वडिलाधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणून भेट घेतली. त्यांनी मला स्पेशल वेळ दिला. अपेक्षित चर्चा झाली. मला विश्वास आहे इलेक्टीव मेरिटवर एकनाथ शिंदे मला उमेदवारी देतील. शिंदे यांनी जिल्ह्याची परिस्थितीत, रचना समस्या समजून घेतली आहे. माझ्या जमेच्या आणि कमकुवत बाजू त्यांनी समजून घेतल्या आहेत. चर्चेत दोन विषय महत्त्वाचे होते. मला उमेदवारी का द्यावी? दुसरं लोकांची मानसिकता काय आहे? ज्यामुळे लोक मत देतील. मला विश्वास आहे. ते त्यांचा सोर्स तपासल्यानंतर मला उमेदवारी देतील”, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.
विनोद पाटील निवडणूक लढण्यासाठी का इच्छुक?
“मला जनतेने उभे राहायला सांगितले आहे. आग्र्याला शिवजयंती कार्यक्रमात लोकांनी मला उभे राहायला सांगितले. आज १८ गावांमध्ये मला प्रचंड प्रतिसाद आहे. मी सामान्य आहे यावर निवडणूक लढवणार आहे”, असं विनोद पाटील यांनी सांगितलं. “मंत्री संदीपान भूमरे यांना उमेदवारी द्यावी की नाही? याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. कुणाला उमेदवारी देऊ नये ही माझी मागणी नाही. मला उमेदवारी द्या, अशी माझी मागणी आहे. तरुणांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शहराला 15 वर्षांपासून पाणी नाही. शहरात कंपनी आणायच्या आहेत, तरुणांना रोजगार द्यायचा आहे. यासाठी मला निवडणूक लढवायची आहे”, अशी भूमिका विनोद पाटील यांनी दिली.
‘मी कुठल्या पक्षाचा अधिकृत सदस्य नाही’
“मी कुठल्या पक्षाचा अधिकृत सदस्य नाही. यामुळे अपक्ष लढलो तर बंडखोरी होत नाही. मी एखाद्या शॉपिंगसाठी निघालो नाही. मी जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहे. माझा प्रश्न आहे लढायचा, तर मी लढणार आहे. जनतेने याबाबत निर्णय घेतलेला आहे”, असं विनोद पाटील म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी नाही म्हणून सांगितलं नाही किंवा हो म्हणून सांगितलं नाही. वेट म्हणून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की, मी कळवतो आणि ते कळवतील. तुमच्या वर्तमानपत्रातून कळवतील, तुमच्या माध्यमातून कळतील किंवा मला डायरेक्ट थेटपणे सांगतील. ते कळल्यानंतर पुढची भूमिका आहे. मी परत एकदा स्पष्ट करतो मला उमेदवारी द्या. मला तरुणांसाठी लोकसभेची उमेदवारी पाहिजे. यामुळे उमेदवारी द्या”, असं आवाहन विनोद पाटील यांनी केलं.