Raj Thackeray: कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!; राज ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांनाच निर्वाणीचा इशारा

| Updated on: May 10, 2022 | 5:26 PM

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून अत्यंत मोजक्याच शब्दात पत्रं लिहिलं आहे.

Raj Thackeray: कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!; राज ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांनाच निर्वाणीचा इशारा
मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसेने (mns) भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) आणि संतोष धुरी हे अटकेच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. त्यामुले मनसेत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी एक पत्र लिहून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला ते पाकिस्तानातील अतिरेकी आहेत की हैदराबाद संस्थानातील रझाकार आहेत? असा सवालही राज ठाकरे यांनी या पत्रातून केला आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून अत्यंत मोजक्याच शब्दात पत्रं लिहिलं आहे. मात्र, या पत्रात त्यांनी थेट भाष्य केलं आहे. सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

 

पाकिस्तानातून आलेले अतिरेकी आहेत का?

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे. ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत. अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असं सांगतानाच राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.