मुंबईत कोळी बांधवांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचा संताप; आता जिवंत कोंबडी आणि बकरा…
मुंबईतील मासळी बाजारात मासे कापून विकण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी "जिवंत कोंबडी घरी न्यायची का?" असा सवाल करत सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

मुंबईतील मासळी बाजारांमध्ये मासे कापून विकण्यावर निर्बंध घालण्याच्या कथित निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियाद्वारे सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर अन्याय केला जात आहे, असा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.
नेमका वाद काय?
मुंबईतील काही मासळी बाजारांमध्ये महानगरपालिकेने मासे विक्रेत्यांना विशेषतः कोळी महिलांना मासे कापण्यास मनाई केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मासे विक्रेत्यांना सक्ती केली आहे. कोळी महिलांनी ग्राहकांना अख्खे (न कापलेले) मासे विकावेत. जर मासे कापले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. बाजारात मासे कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. माशांच्या अवशेषांमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते. तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. स्वच्छता राखण्यासाठी बाजारात मासे कापू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. या निर्णयामुळे कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आता या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. “कोळी बांधव मुंबईत मासे विकणारच… तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या पोटावर पाय देणारे तुम्ही कोण? जर अस्वच्छतेचा नियम फक्त माशांसाठीच असेल, तर मग चिकन घेताना जिवंत कोंबडी आणि मटण घेताना जिवंत बकरा घरी न्यायचा का? असा सवालही अखिल चित्रे यांनी केला आहे.
अखिल चित्रे यांचे ट्वीट
“कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये” असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार… तुमच्या नाकावर टिच्चून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आलेत त्याच पद्धतीने विकणार… मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करुन दाखवावीच. आम्हीही पाहून घेऊ कि मुंबईच्या खऱ्या मानकरींना कोण डिवचतं ते.
आणि एक गोष्ट स्पष्ट करा… मग chicken घेताना पूर्ण जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का? mutton घेताना जिवंत बकरा घेऊन जायचा का? की नियम आणि “अस्वच्छता” फक्त मासळी बाजारासाठीच का? भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांनो, तुमचे मनसुबे आम्ही ओळखून आहोत. तुमचं लक्ष्य आता कोळीबांधवांना त्रास देण्याचं आहे. कारण कोळीवाड्याच्या जमिनीवर तुमच्या मालकाचा डोळा आहे, मालकापाशी तुमची लाचारी सिद्ध करायला तुम्ही असेच निर्णय घेणार, असे अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.
“कोळ्यांनी मासळी बाजारात मासे कापून विकू नये” असा निर्णय भाजपा-शिंदे गटाकडून घेतला जातो. का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईच्या खऱ्या मूळ रहिवासी म्हणजे आमच्या कोळीबांधवांच्या उदरनिर्वाहावर अशाप्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे, आमचे कोळी… pic.twitter.com/WbEZ6H0hn4
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) May 7, 2026
दरम्यान आता या वादामुळे आगामी काळात मुंबईतील मासळी बाजारांमधील वातावरण आणि प्रशासन विरुद्ध कोळी समाज असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.