अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न; बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Ajit Pawar Group and Shivsena Shinde Group : अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरु आहे, असं मोठं विधान करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने हे विधान केलं आहे. या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर...

अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न; बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
आयेशा सय्यद | Updated on: Sep 08, 2024 | 8:03 AM

जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा खात्याची मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे पाठवलेली फाईल तब्बल दहा वेळा परत आल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘अर्थ खात हे सर्वात नालायक खातं… दहा वेळा मी पाठवलेली फाईल परत यायची मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही’, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. त्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणं हे अतिशय धक्कादायक आहे. अजित पवारांना महायुतीतुन बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न आहेत, असं जयंत पाटील म्हणालेत.

लाडकी बहीणवरून टोला

लाडकी बहीण योजनेवरून सरकारमधील तिन्ही पक्ष जाहिरात करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर गुलाबी कॅम्पेन सुरु केलं आहे. त्यावरही जयंत पाटलांनी भाष्य केलंय. एजेन्सी त्यांना काय काय करायला लावेल माहित नाही. सरकारी योजना मीच काढल्यावरून तीन पक्षांमध्ये स्पर्धा आहे. माझे त्यांचे अलिकडे बोलणं झालं नाही. त्यांना पश्चाताप झालाय का माहित नाही, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

सद्बुद्धी आहे आणि बुध्दी आहे. म्हणून त्यांच्या चुका आम्ही मांडत आहोत. बऱ्याच लोकांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. लाडक्या बहिणीची ओढाताण होत आहेत. लाडकी बहिण गोंधळली आहे. त्यामुळे ती आता महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेत आणत आहेत, असं म्हणत जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

लोकांच्या मनातलं सरकार येणार- पाटील

लाडक्या बाप्पांचे आगमन सर्वत्र झाले आहे. बाप्पा येत्या नोव्हेंबर महिन्यात हे सरकार जाऊन नवे लोकांच्या मनातले सरकार सत्तेवर येईल. अजून ठरलेले नाही. पण बरेच लोक आमच्या पक्षात येतील. हा महायुतीचा संबंध नाही. आमच्या लाडक्या बहिणीची ओढाताण करत आहे. लाडकी बहिण गोंधळली आहे. लाडक्या बहीणीला वाटतंय की मला शांततेत राहायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us